मुंबई : लडाखमध्ये जवानांची बस नदीत पडून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण आले. यामध्ये खटावचे सुभेदार विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव यांचा समावेश आहे. विजय शिंदे यांचे पार्थिव रविवारी (२९ मे) विसापूर (ता. खटाव) येथे आणले जाणार आहे. तिथेच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत जाधव (२७) हे गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक येथील रहिवासी होते. प्रशांत यांचे दोन वर्षापूर्वीच लग्न झाले होते. तर सुभेदार विजय शिंदे हे १९९८ मध्ये २२ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत रुजू झाले होते. २४ वर्षांच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी स्तरावर काम करून देशसेवा केली होती. या दोघांच्या निधनामुळे कुटुंबिय, ग्रामस्थांसह राज्यावर शोककळा पसरली आहे.
लडाखमध्ये २६ जवानांना घेऊन जाणारी बस नदीत पडली आहे. या अपघातात लष्कराच्या सात जवानांचा मृत्यू झाला. तर अनेक जवान जखमी झालेत. अपघातानंतर जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा अपघात झाला. लष्कराची बस ५०-६० फूट खोलवर श्योक नदीत कोसळली. ज्यामध्ये लष्कराचे सर्व जवान जखमी झाले. सर्व जवानांना परतापूर येथील ४०३ फील्ड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आणि लेहहून परतापूरला सर्जिकल टीम पाठवण्यात आली.