Sunday, July 7, 2024
Homeमहत्वाची बातमीशिवसेनेच्या नेतृत्वात संभाजीनगरात पाण्याचा सत्यानाश

शिवसेनेच्या नेतृत्वात संभाजीनगरात पाण्याचा सत्यानाश

फडणवीसांचा घणाघाती आरोप

औरंगाबाद : शिवसेनेच्या नेतृत्वात संभाजीनगरात पाण्याचा सत्यानाश झालाय आणि त्याची फळं आता इथली लोक भोगत आहेत, अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून यासाठी सरकारला धारेवर धरण्यासाठी भाजपच्या वतीने आज जल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गंभीर बनला आहे. महापालिकेला नियोजन न जमल्याने औरंगाबादकरांना आठ दिवसांआड पाणी मिळत आहे. महापालिका पाणीप्रश्न हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादकडे दुर्लक्ष केले आहे. या दोन्ही यंत्रणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपच्या वतीने आज महापालिकेवर जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. सतत इतके वर्ष सातत्याने महानगर पालिकेची सत्ता गाजवूनही संभाजीनगरात पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या नेतृत्त्वात झालाय, त्याची फळं संभाजीनगरची लोक भोगत आहेत. इथे पाणीच नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागतोय. मी मुख्यमंत्री असताना जी योजना मंजूर केली आणि १६०० कोटी रुपये दिले. त्या योजनेत बदल करुन ६०० कोटी महापालिकेने द्यावे, असा निर्णय या सरकारने केला. इथे महापालिकेकडे पगार द्यायला पैसे नाहीत, अशी परिस्थिती आहे”, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

“केंद्र सरकारने दिलेले पैसेच या योजनेत वळवले आहेत. योजनेचा ठेकेदार कामही करत नाही. अर्धा किलोमीटरही काम झालेलं नाही. ४० किलोमीटर काम करायचं आहे. ज्या वेगाने काम चाललंय त्या वेगाने २५ वर्ष लागतील, त्यामुळे भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चा काढत आहोत, प्रचंड प्रतिसाद त्याला आहे, पाण्याची समस्या सुटेपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहणार”, असंही त्यांनी सांगितलं.

“नाना पटोले हे रोज खोटं बोलतात. मनाला येईल ते बोलतात त्यामुळे अशा व्यक्तीला उत्तर देण्याचं कारण नाही. २४/७ पाणी पुरवठ्याचा अवॉर्ड नागपूरला मिळालाय. हे नाना पटोलेंना माहिती नाहीये”, असं म्हणत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर टीका केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -