Thursday, May 15, 2025

रायगड

कांदळवनावर बेकायदा भराव; कोळी समाज आक्रमक

कांदळवनावर बेकायदा भराव; कोळी समाज आक्रमक

मुरुड (वार्ताहर) : कोकण किनारपट्टीवरील अलिबाग व मुरुड तालुक्यात समुद्राला येऊन मिळणाऱ्या खाड्या बुजविण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. मुरुड तालुक्यातील ताराबंदर कोलमांडला येथील कांदळवनांवरील अनधिकृत भरावाविरोधात महादेव कोळी समाज ताराबंदर यांनी पोलिसांमध्ये रितसर तक्रार दाखल केली आहे.


तसेच शुक्रवारी दि. २० रोजी बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ताराबंदर खाडीलगत चालू असलेल्या अनधिकृत भराव तसेच कांदळवनाच्या कत्तलीविरोधात ग्रामस्थ मंडळ ताराबंदर यांनी ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली. यावेळी सरपंच चेतन जावसेन, ग्रामविकास अधिकारी गाडेकर, ताराबंदर कोळी समाज अध्यक्ष वैभव भोईर, भालचंद्र वर्सोलकर, कृष्णा परदेशी, प्रशांत भोईर, राजेश तरे, प्रतीक कणगी व इतर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.


ग्रामपंचायत बोर्ली पंचक्रोशीतील कोलमांडला ताराबंदर येथील ग्रामस्थांनी पोलिसांत आतापर्यंत अनेकदा तक्रार अर्ज दिले आहेत. यामध्ये बोर्ली-ताराबंदर खाडीतील, समुद्रकिनारी स्थित असलेल्या शासकीय कांदळवनात काही समाजकंटकांकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर कांदळवनात माती, दगड, मुरूम इ.चा बेकायदेशीरपणे भराव टाकून कांदळवनाच्या झाडांची कत्तल केली आहे. सदर बेकायदेशीर काम त्वरित बंद करावे. कांदळवनाचे संवर्धन करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. याप्रकरणी ग्रुप ग्रामपंचायत बोर्ली, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, वनविभाग, जिल्हाधिकारी रायगड यांनी कार्यवाही करावी, अशी विनंती महादेव कोळी समाजाने केली आहे.


तक्रार पत्रात नमूद केल्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मौजे कोलमांडला गट क्रमांक ४९ येथे हे सर्व अनधिकृत कामे केली जात आहेत. तक्रार दिल्याच्या दिवशी शेकडो झाडांची कत्तल झाली आहे तसेच अतिक्रमणही चालूच आहे. गावकऱ्यांचा आक्रोश लक्षात घेता हे अनधिकृत कामे अशीच चालू राहिली, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Comments
Add Comment