पुणे (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यातील सभेत बोलताना अयोध्या दौरा स्थगित करण्याचे कारण स्पष्ट केले. ‘पायाचे दुखणे सुरू झाल्यामुळे कमरेला त्रास होतो. त्याबाबतची शस्त्रक्रिया १ तारखेला आहे’, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. तसेच ‘आपल्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणे म्हणजे एक सापळा होता आणि त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली’, असा आरोपही त्यांनी केला.
‘मी मुद्दाम दोन दिवस आधी या दौऱ्याबद्दल सांगितले. कोण काय बोलतेय? हे बघायचे होते. हा विषय मुद्दाम सुरू केला आहे. हा एक सापळा आहे, हे माझ्या लक्षात आले. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासोबतच कारसेवकांना मारल्यानंतर शरयू नदीत मृतदेह टाकण्यात आले होते. त्याचे दर्शन मला घ्यायचे होते. जर मी अयोध्येत गेलो असतो आणि तिथे काही झाले असते, तर माझ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असते. माझे कार्यकर्ते मी हकनाक घालवणार नाही. तिकडे केसेस टाकल्या गेल्या असत्या. एक कोणी तरी खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो हे शक्य आहे का? माझ्यावर टीका होणार असेल तरी चालेल. पण कार्यकर्ते अडकू देणार नाही, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
संभाजी नगरच्या नामांतरावरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. केंद्रात सत्तेत असताना का नामांतर केले नाही, असा प्र्श्न त्यांनी विचारला. ‘मी म्हणतो’ म्हणजे काय याला काय अर्थ आहे, अरे तू आहेस कोण? वल्लभभाई पटेल आहेस की महात्मा गांधी? असा टोलाही त्यांनी लगावला.