Monday, August 4, 2025

पावसात भिजून भाषण करावे म्हटले पण निवडणुका नाही - राज ठाकरे

पावसात भिजून भाषण करावे म्हटले पण निवडणुका नाही - राज ठाकरे

पुणे : औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आज पुण्यात पार पडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात राज ठाकरे यांनी सभेला सुरुवात करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.


राज ठाकरे सभेच्या सुरुवातीला म्हणाले, “आपल्या सभेला हॉल परवडत नाहीत, एसपी कॉलेजला विचारे होते, पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असे ते म्हणाले. पावसात भिजून भाषण करावे म्हटले पण निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना नाव न घेता टोमणा लगावला आहे.


शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो


औरंगजेब हा सुफी संत वाटतो, असा खोचक टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला. तसेच तुमच्या राजकारणासाठी तुम्ही इतिहास बदलणार आहात का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो. तर अफजलखान हा महाराजांना मारायला आलाच नव्हता, तर राज्याचा विस्तार करायला आला होता, असे पवार म्हणतात.


मग काय शिवाजी महाराज मध्ये आले होते का?, असे राज ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी काल महाविकास आघाडी सरकार झालेले बघून बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता, असे वक्तव्य केले होते. त्याचाही राज ठाकरे यांनी समाचार घेतला. असे वक्तव्य करून शिवसेना बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवत आहेत, शिवसेनेला एवढीही अक्कल नाही, असे ते म्हणाले.


पूर्वीही देशात जातीचे राजकारण होते. मात्र, जेव्हापासून राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासून देशात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमणात केले जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना हिंदू शब्दाची ॲलर्जी असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. तसेच शरद पवार हे नास्तिकच असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते.


शरद पवार हे नेहमी सांगतात की, फुले-शाहू-आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र त्यांचा आहे. परंतु, आधी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. फुले-शाहू-आंबेडकर हे शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे गेले आहेत. मी जात मानत नाही. माझा जातीपातीत विश्वास नाही, असेही राज ठाकरे म्हणाले होते.

Comments
Add Comment