मुंबई : मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. येत्या दोन दिवसात मान्सून केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मान्सूनच्या अगोदरच केरळमध्ये पाऊस दाखल झाला आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. वैज्ञानिकांच्या मते, केरळवर सध्या आलेले ढग मोठ्या आकाराचे आहेत. या ढगांमुळे मोठा पाऊस पडतो, यामुळं पिकं उद्ध्वस्त होतात. झाडे उन्मळून पडतात.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ५ जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर १२ जून ते १५ जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. यंदाही महाराष्ट्रात मान्सून दरवर्षीप्रमाणे पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाचे पुणे क्षेत्र प्रमुख अनुराग कश्यप यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाळ्याआधीच शेतकऱ्यांना वित्तहानीला सामोरे जावे लागले आहे.