नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव ब्रीज शेजारून जाणारा सर्विस रोड पूर्ण होत नाही; तोपर्यंत श्री देव कोळंबा येथे मिडलकट ठेवून पर्यायी मार्ग द्या, मागणी नसताना गतिरोधक का घातले, यापुढे चुकीचे गतिरोधक घालू नका, पावसात ज्या घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे तेथे तातडीने काम करा व मोरी बांधा, पाऊस पडल्यावर कोणाच्या तक्रारी नकोत, अपघात होईल आणि निरपराध लोकांचे जीव जातील, अशी घटना घडणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नांदगाव येथे महामार्गाच्या अर्धवट कामाची पाहणी गुरुवारी आ. नितेश राणे यांनी केली तेव्हा ते बोलत होते.
नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवून महामार्ग प्राधिकरणाने प्रवाशांना अपघाताचे आमंत्रण दिले आहे. हा सर्व्हिस रोड कधी पूर्ण करणार, त्याचा प्रश्न कसा निकाली काढणार याबाबतसुद्धा चर्चा करण्यात आली. ज्यांची घरे, जमिनी गेल्या त्यांचा मोबदला तातडीने देण्यासाठी जलदगतीने काम करा. दोन-चार महिने नोटीस पोहोचण्यासाठी का वेळ लागतो? याचे आत्मपरीक्षण महसूल विभागाने करावे. प्राथमिक शाळेत येणाऱ्या मुलांसाठी महामार्ग कसा ओलांडावा याचे नियोजन करा, पर्याय काय असेल तो द्या, ब्रीजवरील लाइट बंद आहेत ते लावा, गटारे आणि वीज वितरणचे लाइटचे बॉक्स उघडे ठेवले आहेत ते बंद करा, अशा सूचनाही यावेळी आ. नितेश राणे यांनी दिल्या.
नितेश राणे यांनी नांदगाव येथे भेट देऊन महामार्ग चौपदरीकरण कामाच्या प्रलंबित कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यासंदर्भात कणकवली प्रांत कार्यालय येथे अधिकाऱ्यांचीसुद्धा भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नांदगाव येथे आ. नितेश राणे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी हायवे अधिकारी यांना ज्या काही मागण्या नांदगाववासीयांच्या आहेत त्या तातडीने मार्गी लावा. अशा सूचना आमदार नितेश राणेंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता जाधव, केसीसीचे पांडे, उपअभियंता कुमावत, केसीसी ठेकेदार कंपनी अधिकारी, पोलीस निरीक्षक हेमंत हुलावले, पोलीस हवालदार मंगेश बावधाने, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपस्थित होते.