मुंबई : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी खूशखबर आहे. येत्या दहा दिवसांमध्ये गहू स्वस्त होऊ शकतो. वास्तविक, सरकारने गव्हाचा साठा आणि किंमतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीत अन्नधान्य वाटपासाठी नवीन आदेश जारी केला आहे.
आठवडाभरात गव्हाचे भाव उतरण्यास सुरुवात होईल. स्वस्त गव्हामुळे पिठाचे भावही घसरणार आहेत. देशातला गव्हाचा साठा कायम ठेवण्यासाठी गव्हाच्या निर्यातीचा आदेश जारी करण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत गव्हाचा साठा कमी होणार नाही. लवकरच इंडोनेशियातल्या तेलाच्या किंमतीचा आढावा घेतला जाणार आहे. वाणिज्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले, देशात घरगुती वापरासाठी पुरेल इतका गव्हाचा साठा आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शेजारील देश आणि अन्य गरजू देशांच्या विनंतीनुसार गहू निर्यात केला जाऊ शकतो. आमची प्राथमिकता देशाच्या अन्नसुरक्षेला आहे.
कृषी मंत्रालयाच्या अंदाजानंतर त्यावेळची परिस्थिती पाहून निर्यातबंदीचा आढावा घेता येईल. सरकारचा निर्यातबंदीचा आदेश कायम नाही. वेगाने वाढणा-या महागाईला आळा घालण्यासाठी भारताने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. भारताने यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. भारताच्या या निर्णयावर जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर जी ७ गटाने भारताच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. जर्मनीचे कृषी मंत्री केम ओझदेमिर म्हणाले, भारताच्या या निर्णयामुळे जगात अन्न संकट वाढेल.