पुणे (प्रतिनिधी) : भारतासह जगभरात उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य झाली असून जागतिक स्तरावर १.१३ अब्ज लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनंतर सांगण्यात येते. उच्च रक्तदाब हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. अनेकांना तर हा काय आजार आहे हेही माहिती नसते.
१७ मे हा जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड हायपर टेन्शन लीगकडून याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी या दिवशी विविध उपक्रम राबविले जातात. अनेकांना या आजाराबाबात माहिती नसते आणि मग ते वेळेवर यावर उपचार करू शकत नाही.
विचित्र लाइफस्टाइल, डाएट आणि स्ट्रेस यामुळे तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात. यातील एक समस्या म्हणजे उच्च रक्तदाब (हायपर टेन्शन). ज्याला हाय बीपी असेही म्हटले जाते. हायपर टेन्शन आता एक प्रमुख समस्या बनली आहे. यामुळे देशातील लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांची ओळख पटत नसल्याने हा आजार आणखी बळावतो.
डॉक्टरांनुसार ही समस्या तणाव, खाण्या-पिण्यातील बदल, दारू, तंबाखू, किडनीशी निगडीत आजाराने किंवा फिजिकल अॅक्टिव्हिटी कमी झाल्याने होऊ शकते. उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढणे हे आहे. त्यामुळे आहारातील सोडियम कमी केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते आणि रक्तदाब ५ ते ६ एमएम/एचजीने कमी होऊ शकतो. सोडियम दररोज २,३०० मिलीग्राम पर्यंतच घ्यावे. यासाठी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कमी प्रमाणात खावेत, असा सल्ला डॉक्टर देतात.
तुमचे हृदय शरीरातील सर्वच अंगाना रक्त पोहोचवण्याचे काम करते. ब्लड फ्लो दरम्यान तुमचे हृदय एक प्रेशर तयार करते. या दबावालाच ब्लड प्रेशर म्हटले जाते. याने तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह वेगाने होतो. अशावेळी तुमच्या हृदयाला अधिक काम करावे लागते. सामान्य ब्लड प्रेशर १२०/८० एमएमएचजी इतके असते. जेव्हा ब्लड प्रेशर १४०/९० एमएमएचजीपेक्षा जास्त झाले असेल, तर तुम्ही हायपर टेन्शनने ग्रस्त असण्याची शक्यता आहे. हायपरटेन्शनचे कोणतेही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाही.
हायपर टेन्शनची लक्षणे म्हणजे छातीत दुखणे-छातीत भरून येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, खूप जास्त थकवा जाणवणे, मान, पाठ, हात किंवा खांदे दुखणे, सतत खोकला येणे, भूक कमी लागणे. हायपर टेन्शनवर उपाययोजना म्हणजे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये हेल्डी फूडचा समावेश करावा लागेल. हिरव्या भाज्या अधिक खायला हव्यात. सतत बाहेरच खाणे टाळा. रोज नियमीत व्यायाम करा. मद्याचे सेवन कमी करा. स्मोकिंग करु नका, असा सल्ला डॉ. कामरान इनामदार यांनी दिला आहे.