नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रात भारताने आज आणखी एक पाऊल पुढे टाकले असून स्वदेशात निर्मित ५जी टेस्ट बेडचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायचा आज रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान मोदी त्यात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मोदींनी या प्रकल्पाशी संबंधित प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या. देशातल्या ग्रामीण भागात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी या प्रणालीचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास या कार्यक्रमात मोदींनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५जी टेस्ट बेड लॉन्च करून देशाला समर्पित केला आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, त्यांना स्वनिर्मित ५जी टेस्टबेड देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली आहे. दूरसंचार क्षेत्रातील गंभीर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ५जी टेक्नॉलॉजी देशाच्या कारभारातही सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. यामुळे कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक या प्रत्येक क्षेत्रातील वाढीला चालना मिळेल. त्यामुळे सुविधाही वाढणार असून रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होणार आहेत.
“मी या प्रकल्पाशी संबंधित सर्व सहकाऱ्यांचे, आमच्या आयआयटीयंसचे अभिनंदन करतो. देशाचे स्वतःचे ५जी आय च्या रूपात बनवण्यात आले आहे. ही देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. देशातील खेड्यापाड्यात ५जी तंत्रज्ञान पोहोचवण्यात ती मोठी भूमिका बजावेल. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, २१व्या शतकातील कनेक्टिव्हिटी भारताच्या प्रगतीचा वेग ठरवेल. त्यामुळे प्रत्येक स्तरावर कनेक्टिव्हिटीचे आधुनिकीकरण करावे लागेल.