प्रशांत जोशी
डोंबिवली : गावाहून मुंबईत मुलीकडे चाललेल्या त्या आजीला दोन दिवसांचा मनस्ताप सोसावा लागला. नशीब बलवत्तर म्हणून नाहीतर बेवारस म्हणून कोणत्या तरी अनाथ आश्रमात जाण्याची वेळ त्या आजींवर आली असती. केवळ बस कंडक्टरच्या ऐकण्याने प्रसंग मुश्कील झाला. हरवलेल्या आजीला पोलिसांच्या तत्काळ प्रयत्नाने आजीला पुन्हा कुटुंब मिळाले आणि ती सुखरूप घरी पोहोचली.
याबाबत पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार, लेकीच्या घरी येण्यासाठी आजीने रत्नागिरीमधून एसटीने प्रवास केला. बसचालकाला आजीने कळंबोलीला उतरणार असल्याचे सांगितले. मात्र बसचालकाने डोंबिवली ऐकल्याने आजीला डोंबिवलीत उतरविले. काही वेळाने आपण चुकीच्या ठिकाणी उतरल्याचे आजीला समजले, पण लेकीच्या घरी कधी जाणार या चिंतेत डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल जवळ एका दुकानाजवळ दोन दिवसांपासून आजी रडत बसल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी मानपाडा पोलिसांना माहिती दिली.
मानपाडा पोलिसांनी आजींची विचारपूस केल्यावर सुरुवातीला व्यवस्थित माहिती देऊ शकली नाही. आजीची मन:स्थिती पोलिसांना माहीत असल्याने पोलिसांनी त्यांना समजावले की, आजी आम्हाला व्यवस्थित माहिती दिल्यास आम्ही तुमच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचू शकतो. घाबरलेल्या आजीला धीर आला. आजीकडून माहिती मिळल्यावर पोलिसांनी आजीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. रत्नागिरी मुर्डव येथे राहत असलेल्या आजींच्या मुलाला फोन केला. यावेळी मुलगा आईला तळोजा भागात शोधत असल्याचे समजताच त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात आई आणि मुलाची भेट झाली.