मुंबई (प्रतिनिधी) : यंदाच्या पावसाळ्यात २२ दिवस असे आहेत की, त्या दिवशी समुद्राला मोठी भरती येणार आहे. जून, जुलै महिन्यात प्रत्येकी सहा दिवस आणि ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात प्रत्येकी पाच दिवस मोठी भरती असेल, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या डेटावरून समोर आले आहे. दरम्यान या कालावधीत मुसळधार पाऊस झाला तर तुंबई होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधील सर्वात मोठी भरती ४ जून आणि ३ जुलै रोजी असेल असेल. “उच्च भरतीच्या वेळी, प्रशासन सतर्क असेल कारण त्याच दिवशी मुसळधार पाऊस काही भागांमध्ये दीर्घकालीन पूरास कारणीभूत ठरतो. संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांना ड्रेनेज साफ करणे, रस्त्यांची दुरुस्ती, झाडांची छाटणी यासारखी सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण होतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. २०२१ मध्ये मुंबईत १८ दिवस मोठ्या भरतीचे होते. मात्र त्यात वाढ होऊन यंदा २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईतील नालेसफाईवरून राजकारण चांगलेच तापते. यासाठी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीदरम्यान, नागरी संस्था आणि इतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुसरीकडे, भूस्खलन प्रवण भागात राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भूस्खलनाची प्रवण क्षेत्रे म्हणून ७२ ठिकाणे ओळखण्यात आली असून त्यापैकी ४५ धोकादायक म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. वार्षिक प्रोटोकॉलनुसार, मुंबई महानगरपालिका अशा भागात राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगून त्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात करेल.