मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील क्रूझ पर्यटन व्यवसायात येत्या दशकभरात १०पट वाढीची क्षमता आहे, या क्षेत्रात सध्या मागणी वाढत असून ते एक मोठे उत्पनाचे साधन ठरू शकेल, असं मत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वांनंद सोनोवाल यांनी व्यक्त केले.
“केंद्र सरकारने, या क्षेत्राची क्षमता ओळखली असून, या क्षेत्रांत भारताला प्रथम क्रमांकावर नेण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी सागरी आणि नदीवरील क्रूझ क्षेत्रांत, अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी सुरू आहे,” अशी माहिती सोनोवाल यांनी दिली. मुंबईत आज पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
भारतात, क्रूझ उद्योगासाठी अनेक सुंदर आणि भव्य अशी स्थळे आहेत असे सांगत भारताला ७,५०० किमीच्या लांब सागरी किनारपट्टीचे आणि लांबच लांब नद्यांचे वरदानही लाभले आहे, असे त्यांनी सांगितले. असे असले तरी भारतात या क्षेत्राला मोठा वाव आहे, असे सांगून भारतात क्रूझ पर्यटनाला चालना देण्यात, जागतिक भागीदार गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, आणि उत्तम पायाभूत सुविधा तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाचा अंगीकार करून, भारत, या क्षेत्रातील पर्यटनात जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सल्लागार मंडळाची स्थापना
केंद्र सरकारने क्रूझ पर्यटनाचा विकास आणि प्रोत्साहनासाठी, एक कृती दल स्थापन केले आहे, अशी माहिती सोनोवाल यांनी दिली. जहाजबंधणी आणि पर्यटन विभागांचे सचिव या कृती दलाचे नेतृत्व करतील. त्याशिवाय, एक उच्चस्तरीय सल्लागार समितीही नेमण्याची त्यांनी आज घोषणा केली. या समितीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ यांचा समावेश राहील आणि देशात क्रूझ पर्यटन क्षेत्राची एक संपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यात ही समिती कृती दलाला योग्य तो निर्णय घेण्यास आणि इतर मार्गदर्शन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचा भाषणात उल्लेख करत, सोनोवाल म्हणाले,- “दळणवळातूनच, देशाचे परिवर्तन घडवणे शक्य आहे. आणि त्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा लाभ घ्यायला हवा.” बंदरांचे महत्त्व विशद करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, बंदरे-प्रणीत विकास, देशात, वाहतूक आणि पर्यटन अशा दोन्हीची एक सर्वसमावेशक व्यवस्था, विशेषतः क्रूझ पर्यटन क्षेत्रांत, निर्माण करण्यात सहाय्यकारी ठरेल.”
या क्षेत्रांत, पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग, यासाठी मंत्रालयाने राबवलेल्या उपक्रमांची माहिती, राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. किनारी मार्गावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, दीपस्तंभ आणि बेट विकाससारखे उपक्रमही राबवले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. नद्यांवरील क्रूझ म्हणजेच आंतरदेशीय क्रूझ या क्षेत्रांत देखील अनेक सूप्त क्षमता असून, त्या वाढविण्याची गरज आहे, असे नाईक म्हणाले.
बंदरे आणि जहाजबांधणी विभगाचे सचिव, संजीव रंजन यांनी सांगितले की, कोरोना महामारीनंतरच्या काळात, भारतातील पर्यटन क्षेत्राने अधिक उसळी घेतली असून, क्रूझ पर्यटन क्षेत्रात वार्षिक आधारावर, ३५% वृद्धी नोंदली गेली आहे. केंद्र सरकारने सागरी क्षेत्र दृष्टिकोन आराखडा-२०३० तयार केला असून, त्यात पर्यटन, आयुर्वेद पर्यटन, किनारी पर्यटन, नदी पर्यटन यावर भर देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारचे उपक्रम
क्रूझ प्रवासी वाहतूक सध्या वार्षिक ४ लाख इतकी असून ती ४० लाखांपर्यंत वाढवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. आगामी काळात क्रूझ पर्यटनाची आर्थिक क्षमता ११० दशलक्ष डॉलर्स वरून ५.५ अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
देशातील सात प्रमुख बंदरांचा दर्जा सुधारणा आणि आधुनिकीकरण केले जात असून यात मुंबईत उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचा समावेश आहे, यासाठी सुमारे ४९५ कोटी रुपये एकूण खर्च अपेक्षित आहे.
केळशी दीपगृहाचे उद्घाटन
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात केळशी दीपगृहाचे उद्घाटनही या परिषदेदरम्यान करण्यात आले. नवीन दीपगृह रायगड जिल्ह्यातील नानवेल पॉइंट दीपगृह आणि रत्नागिरी जिल्ह्यातील टोळकेश्वर दीपगृह दरम्यानचे ८५ किमी अंतर भरून काढेल तसेच दिवसा आणि रात्री स्थानिक मच्छीमार समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करेल.