नांदेड : शेतकऱ्यांना एकत्रित करुन त्यांच्या जीवनात बदल व्हावा, यासाठी प्रयत्न व्हायला पाहीजेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. येणाऱ्या काळात ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. सहकारी चळवळीचे प्रश्न मांडण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. देशात सहकार चळवळीत महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा मोठा असल्याचे ते म्हणाले. सुटबुट घातलेल्या व्यक्तीला खुर्ची दिली जाते पण लंगोटवाल्या शेतकऱ्यांना बँका साधे विचारतही नाहीत. तसेच लंगोटवाल्या शेतकऱ्यांची बँकांकडून हेटाळणी होत असल्याचा आरोप पवारांनी केला आहे.
नांदेडमध्ये गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीच्या ‘सहकारसूर्य’ मुख्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शरद पवारांनी उसाच्या संदर्भातही वक्तव्य केले. शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने उसाची तोडणी करावी, यांत्रिकीकरणाचा अवलंब करावा, असेही पवार म्हणाले.
सहकारी बँकेकडे रिझर्व बँकेचा दृष्टिकोन सहकार्याचा असणे गरजेचे आहे. कारण या बँका लहान माणसाला आर्थिक शक्ती देणाऱ्या नाड्या आहेत. सहकार चळवळीचे प्रश्न मांडण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असल्याचे पवार यावेळी म्हणाले. याबाबतीत नितीन गडकरी यांची भूमिका नेहमीच सहकार्याची असते असेही पवार म्हणाले. कोणताही संस्था मजबूत करण्यासाठी घेतलेला पैसा वेळेत परत होणे गरजेचे असते. सहकारी संस्थाकडून घेतलेले पैसे वेळेवर, व्याजसह परत देणे गरजेचे असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
नांदेडच्या गोदावरी काठी गुरुगोविंद सिंगांचे वास्तव्य होते. त्यामुळे नांदेडचा लौकिक आहे. अगोदर गोदावरी, गुरुगोविंद सिंग यांच्यामुळे आणि आता गोदावरी बँकेमुळे लौकिक वाढेल असेही पवार म्हणाले. या बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थकारण सुधारणेसाठी मदत होईल. उसाचे पीक, सोयाबीन, हळद पिके याभागात घेतली जातात. परदेशात पाठवलेल्या साखरेतून वर्षाकाठी 40 हजार कोटी मिळतात. एकट्या उसापासून इथेनॉल, साखर, अल्कोहोल, वीज निर्मिती होते, असेही पवार म्हणाले. तसेच हळद संशोधनाबाबत धोरण ठरवावे. शेतकऱ्यांचा भार कमी करण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय करायला हवेत. देशात सहकार चळवळीत महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा मोठा असल्याचे पवार यावेळी म्हणाले.