हे सकल ब्रह्मांड ज्याने आपले घर मानले होते अशा थोर अवस्थेला पोहोचलेल्या पृथ्वीच्या आसनावर आरूढ होऊन, वायू भक्षून आणि दशदिशांचे वस्त्र परिधान करून कणकवलीच्या परिसरांत सुमारे चार तपे चिर मौन पाळून साऱ्या मानवजातीला दिव्यप्रकाश देणाऱ्या या धगधगत्या मार्तंडाचा, सूर्याचा अस्तसुद्धा अलौकिकच झाला. ज्याचा जन्मच अलौकिक, ज्याची कृती अद्भुत किंबहुना ज्यांचे जीवनच अति विलक्षण अशा दिव्यत्वाचा अंत चमत्कारिक झाला त्यात नवल कसले?
या जगात सर्व गती थांबतील किंवा थांबविता येतील. पण काळाची गती कोणीही रोखू शकणार नाही. कारण तसे घडेल तर ‘‘होणारे न चुके ब्रह्मादिका’ हे स्मृतिवाक्य खोटे ठरेल! ते कशाला? ‘‘नाशिवंत देह जाणार सकळ’ ही तुकोबांची अमर वाणी अपवाद कशी ठरेल? कार्य संपले की गेलेच पाहिजे ! हा जगाचा धर्म आहे. मग ते प्रभु रामचंद्र असोत अथवा, गोपाल कृष्ण असोत, ज्ञानदेव एकनाथ असोत किंवा तुकाराम, रामदास असोत, वा गाडगेबाबा भालचंद्रबाबा असोत. काळ थांबणारच नाही! मग कोण समाधी घेतो, तर कोण गुप्त होतो. कोण श्रीगाडगेबाबांसारखा चालत्या गाडीत देह ठेवतो, तर कोण श्रीभालचंद्र बाबासारखा भजनाच्या गजरात या चराचरांत, विश्वात विलीन होत
– राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!