प्रशांत जोशी
डोंबिवली : डोंबिवली जवळील निळजे गावातील एका शाळेवर तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्तची कारवाई केली. १४ वर्षे जुनी असलेली शाळा १ ली ते १२ वी पर्यंत सुरु असल्याचे संस्था चालक सांगत असून या शाळेत सद्य स्थितीत ३५० विद्यार्थी शिकत होते. प्रशासनाने केलेल्या या कारवाईने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सदर जागेवर अतिक्रमण झाले आहे की नाही यावर ठोस भूमिका घेतांना प्रशासनाने विद्यार्थ्यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे संस्था आणि पालकवर्गानी सांगितले.
निळजे गावात बुधवारी कल्याण तहसीलदार जयराज देशमुख यांनी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सह्याने शाळेवर तोडक कारवाई करत ती जमीनदोस्त केली. यावेळी संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंत पाटील यांसह मुख्याध्यापकांनी सदर ठिकाणी तहसीलदारांना कारवाई न करण्याची विनंती केली होती. मात्र सदर जागेवर अतिक्रमण केल्याने सरकारी नियमाप्रमाणे कारवाई होत असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. सदर जागेचा वापर आराखडा जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या आदेशानुसार यांना २७ फेब्रुवारी २००९ रोजी सादर केल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र प्रशासनानाने कारवाई संदर्भात संस्थेला नोटीस बजावली होती. नोटीसला संस्थेने उत्तर दिले होते. परंतु अचानक प्रशासनाने केलेल्या कारवाईने विद्यार्थ्यांचे पुढील भविष्य कसे असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निळजे येथील सदर जागेवर केलेली कारवाई योग्य आहे. सदर जागेवर अनधिकृत बांधकाम केले होते. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला जागा देण्याचा कोणताही अधिकार नाही. अनधिकृत इमारतीत शाळा भरविणे बेकायदेशीर आहे. त्याच संस्थेची दुसरी इमारत आहे. त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. आमच्या निदर्शनात आल्यावर आम्ही कारवाई केली.
-जयराम देशमुख, कल्याण तहसीलदार