भोंगा आंदोलनाचा लोककलावंतांना फटका

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सुरू झालेल्या भोंगा नाट्यामध्ये लोककलावंत भरडून निघत आहेत. कोरोनानंतर दोन वर्षांनी लोककलांना आणि कार्यक्रमांना चालना मिळू लागली होती. जत्रा, यात्रांमध्ये कार्यक्रम रंगू लागले आहेत. त्यातच भोंग्यांवरून राजकारण सुरू झाल्याने आता कार्यक्रमांदरम्यान पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे, अशी तक्रार लोककलावंत करत आहेत. याचा परिणाम गरीब कलाकारांवर होत असल्याचे लक्षात घेतले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


खान्देश लोककला अकादमीचे शेषराव गोपाळ यांनी राजकारणाचा परिणाम थेट तमाशावर झाल्याचा आक्षेप नोंदवला. ‘राजकारणामुळे मंदिरे, मशिदी यावरील भोंगे बंद करण्याबाबत काही फतवे काढण्यात आले. त्यामुळे आता धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रांत तमाशासाठी भोंगे लावण्यास बंदी करण्यात आली. तमाशा सुरू होण्याआधी पोलिस ठाण्यांकडून भोंगे लावू नका अशी पूर्वसूचना देण्यात येते,’ असे त्यांनी सांगितले.


‘दोन वर्षांहून अधिक काळ तमाशा बंद होता. कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. सरकारने कुठलीही भरीव मदत केली नाही. त्यानंतर आता तमाशा पुन्हा चालू झाला आणि हातात पोटापुरते पैसे येऊ लागले होते. त्यातच भोंग्यांच्या राजकारणामुळे तमाशा कसा करायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे,’ अशी व्यथा लोककलाकार मांडत आहेत. आवाज नसेल तर सादरीकरण करायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. राजकारणामुळे लोककलावंतांची उपजीविका बुडेल, असा कधी विचारही कोणी केला नव्हता, अशी भावनाही व्यक्त केली जात आहे. लोककलावंतांनी कार्यक्रम कसे करावेत, याबद्दलही भोंग्यांवरून राजकारण करणाऱ्यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी आता करण्यात येत आहे.


निवडणुकीच्या वेळी किंवा इतर सभांच्या वेळी राजकारणी भोंगे लावणार नाहीत आणि त्यांची ध्वनिमर्यादा नोंदवून समन्यायी पद्धतीने कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा लोककलावंत करत आहेत.


'परवानगी घेऊन कार्यक्रम करा'


कार्यक्रम सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी घेऊन करता येतील, असे पोलिसांनी सांगितले. यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांशी संपर्क साधता येईल; तसेच पोलिसांच्या वेबसाइटवरही अर्ज उपलब्ध आहेत. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करून आवाजाची पातळी ठेवावी. आवाजासाठी परवानगी घेतली नसल्यास कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. रात्री १० वाजल्यानंतरचे कार्यक्रम ध्वनिक्षेपकाशिवाय करता येतील. धनिक्षेपक नसतानाही आवाजाबद्दल तक्रार आल्यास कारवाई करावी लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला.

Comments
Add Comment

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती मुंबई : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

भिवंडी बायपास रस्त्याचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार मुंबई : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम

मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री, अधिकारीच गैरहजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाराजी व्यक्त मंत्रालयात शुकशुकाट बैठकीला जेमतेम

‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो, स्विगी’ झुकले!

मुंबई : नववर्षाच्या पूर्वसंध्येस ‘झोमॅटो-स्विगी’ या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मनी मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई अग्निशमन दलाकडून २ हजार ७०३ आस्थापनांची तपासणी, १३६ विरोधात कारवाई*

मुंबई : नववर्ष निमित्ताने आयोजित स्वागत सोहळ्यांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे

नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिल्या शुभेच्छा मुंबई : - नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे,