Saturday, March 22, 2025
Homeमहत्वाची बातमीदो गज की दुरी...

दो गज की दुरी…

डॉ. उदय निरगुडकर

सध्या चीनमधल्या शांघाय शहरामध्ये कोविड संसर्गाने हाहाकार माजवला आहे. इथून तयार प्रॉडक्ट्सचा पुरवठा न झाल्यामुळे युरोप, अमेरिका आणि आशियाच्या मार्केटमध्ये मरगळ आहे. त्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग या वर्षाच्या अखेरीला तिसऱ्या निवडणुकीसाठी सज्ज होणार आहेत. अशा वेळी या देशाची झिरो कोविड पॉलिसी योग्य होती की ‘दो गज दुरी, है जरूरी’ असं म्हणणारा भारत यशस्वी ठरला याचा विचार व्हायला हवा.

चीन म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर चिनी खेळणी येत नाहीत, स्वस्त बनावटीच्या चिनी वस्तू येत नाहीत, तर डोळ्यांसमोर येतं वुहान आणि त्या वुहानमध्ये जन्माला आलेला कोविड हा विषाणू आणि त्याने अख्ख्या जगाला कसं गिळंकृत केलं, जगाची अर्थव्यवस्था कशी खिळखिळी करून टाकली, याचं विश्लेषण. त्यामुळे अनेकांना जीवितहानीला कसं तोंड द्यावं लागलं? याच्या करुण कहाण्या समोर येतात. अर्थात चीनच्या पोलादी पडद्यामागे नेमंक काय झालं, हे कधीच समोर आलं नाही. चीनने याला ‘वुहान व्हायरस’ किंवा ‘चिनी व्हायरस’ म्हणायला साफ नकार दिला आणि तो आमच्याकडे निर्माण झालाच नाही, अशी हाकाटी केली. ती खोटी आहे, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. पण आज संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक शांत होत असताना, किंबहुना तो अनेक देशांमधून हद्दपार होत असताना देशा-देशांमध्ये लसीकरणाचं प्रमाण प्रचंड वाढलं असताना खुद्द चीनमध्ये मात्र परिस्थिती भीषण होत चालली आहे; विशेषतः शांघायमध्ये. डायलिसिससारख्या अत्यंत नित्य गरजेच्या गोष्टींसाठीही रुग्णालयात जाता येत नाही, इतकी कडक संचारबंदी आता शांघायमध्ये लागू आहे. तास-दोन तासांचा वेळ मिळतो. संचारबंदी उघडली जाते, तेव्हा दुकानांसमोर प्रचंड मोठ्या रांगा दिसतात. संपूर्ण जनता त्रस्त आहे. अन्नधान्याचा, रोजच्या वस्तूंचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळेच की काय लोक आता ‘बार्टर सिस्टीम’च्या दिशेने प्रवास करत आहेत. त्यांनी आता गटागटाने समूह खरेदीसुद्धा सुरू केली आहे. शांघायचे रस्ते ओसाड पडले आहेत.

जग कोविडमधून बाहेर पडत असताना, मास्क फ्री असण्याचा आनंद उद्भवत असताना शांघायमध्ये मात्र कडक लॉकडाऊन आहे. खरं तर आता-आतापर्यंत चायनाने हा विषाणू किती उत्तमरीत्या मॅनेज केला याचं वर्णन पाश्चात्य माध्यमं करत होती. कोविड आला त्या वेळी संपूर्ण जग कोविडची लढाई हरणार, भारताला ती लढता येणार नाही. इथली आरोग्य व्यवस्था खिळखिळी आहे, इथे लस नाही, मास्क नाही, पीपीई कीट नाहीत, व्हेंटिलेटर नाहीत, ऑक्सिजन नाही अशी जोरदार हाकाटी पाश्चात्य माध्यमांनी केली होती. पण आज काय परिस्थिती आहे? आज भारत दर महिन्याला निर्यातीचे उच्चांक गाठत आहे. जीएसटीचं कलेक्शन दर महिन्याला १.५ बिलियन डॉलर्स इतकं प्रचंड वाढतंय आणि शाघांय मात्र लॉकडाऊनमध्ये बंद आहे. कशामुळे झालं असेल हे? झिरो कोविड पॉलिसीमुळे? कोविड काळात दोन गोष्टींवरील भर महत्त्वाचा आहे. खरं तर दोन गोष्टींपैकी एकाची निवड करायची असते. जीव वाचवायचे की लोकांना कामाला जायला देऊन अर्थव्यवस्था वाचवायची? हे ठरवायचं असतं. त्यातच कुठे काही घोळ झालाय. आज शांघायमधली अवस्था इतकी बिकट आहे की, लोकांना लागणाऱ्या गोष्टी पुरण्यासाठी त्यांनी सरकारी यंत्रणांवर विश्वास ठेवला आहे. सरकारी यंत्रणा साफ कोसळली. जनता वणवण फिरायला लागली आणि रस्त्यावर फिरण्यावरदेखील बंदी आली. आज दोन वर्षं झाली, चीन एक प्रकारे गुडघ्यावर आलं आहे. लॉकडाऊन हा तिथला रोजचाच भाग झाला आहे. आयात, निर्यात बंद झाली आहे. चार आठवड्यांपासून संपूर्ण शांघाय शहर एका विलगीकरणामध्ये म्हणजे इतर जगापासून तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे.

खरं तर चीनसाठी २०२०-२१ काहीसं नॉर्मल गेलं. पण जानेवारी २०२२ मध्ये हाँगकाँगमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला आणि बघता बघता त्यानं अख्ख्या हाँगकाँगला गिळंकृत करून टाकलं. आपल्याला माहिती आहे, ओमायक्रॉन हा अतिशय वेगानं पसरणारा, कमी घातक रोग असला तरी को-मॉर्बलिटिज म्हणजे डायबिटिस, ब्लड प्रेशर असे रोग असलेल्यांना त्याची निश्चित बाधा होते. त्यामुळे हाँगकाँगमध्ये हाहाकार माजला. मग तो शांघायमध्ये पसरला. शांघायमध्ये आतापर्यंत केवळ आठ ते दहा मृत्यू झाले, असा दावा चिनी प्रशासन करत असलं तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे या ओमायक्रॉनचा प्रसार आपल्या प्रतिकाराच्या गतीपेक्षा जास्त होऊ नये म्हणून पुढे जायचा प्रयत्न सध्या चिनी प्रशासन करतंय. दुसरी बाब म्हणजे भारतात विरोधी पक्षांनी लसविरोधी प्रचार करूनही लसीकरणाचे जागतिक उच्चांक आणि मानांकन प्रस्थापित केल गेले. एके काळी इथे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात लसीकरण होत होतं की, केवळ सात दिवसांच्या कालावधीत आपण अख्ख्या इंग्लंडचं लसीकरण केलं असतं. पण आज चीनमध्ये काय अवस्था आहे? चीनमध्ये बहुतांश वयस्कांनी लस घेतलेली नाही. भारताला या चिनी धोक्यापासून शिकण्यासारखं खूप आहे. आतादेखील लसीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हाच संदेश आपल्याला मिळतोय. हाँगकाँगसारख्या एका छोट्या बेटावर आज जवळपास दहा लाख रुग्ण आहेत आणि मागच्या काही महिन्यांमध्ये आठ हजारजण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. मग तेवढ्याच लोकांना बाधा होऊन शांघायमध्ये फक्त आठ ते दहा मृत्यू झाले यावर विश्वास कसा ठेवायचा? पण हा हाँगकाँग आणि चीनमधला मुलभूत फरक आहे.

चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीचं वर्चस्व आहे. त्याची पोलादी पकड त्यांच्या संपूर्ण जीवन व्यवहारावर आहे. त्याच्या माध्यमातून ते काहीही करू शकतात अथवा दाबू शकतात. आतापर्यंत ज्या झिरो कोविड पॉलिसीबद्दल त्यांनी प्रचंड कौतुक करवून घेतलं होतं, त्याचा बुरखा मात्र आता टराटरा फाटला आहे. आजपर्यंत इतर देशांना अक्कल शिकवणारा चीन स्वतः मात्र कोविड पसरत असताना चाचपडताना दिसतोय. अर्थात बाधितांच्या नेमक्या आकड्यांची ब्लँक अँड व्हाइट फिगर कधीच समोर येणार नाही. भारतामध्येदेखील त्यावर संशय घेतला होता; परंतु चीनमध्ये मात्र ते आकडे कव्हर अप करायचे प्रयत्न आता समोर दिसू लागले आहेत. वुहानमध्ये पहिल्यांदा हा रोग पसरला तेव्हा टेस्टिंग लॅबच नव्हत्या. त्यामुळे कित्येक मृत्यू कोविड मृत्यू म्हणून दाखवताच आले नाहीत. सध्या मात्र चिंता आहे ती चीनमधून होणाऱ्या निर्यातीची. चीनकडे संपूर्ण जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून बघितलं जातं. त्यामुळे तिथे मॅन्युफॅक्चरिंग बंद पडलं असेल, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडणार यात शंकाच नाही. आपला जीडीपी साडेपाच टक्क्यांनी वाढेल, असा चीनचा आशावाद होता. तो आता ४.८ टक्के इतका खाली आला आहे. हे आकडेदेखील चॅलेंज केले गेले आहेत. २०२२ च्या पहिल्या तिमाहीतले मॅन्युफॅक्चरिंगचे आकडे आणि विकासाचे दर, निर्यात हे सगळंच खाली कोसळलंय. दुसऱ्या तिमाहीत ते आणखी कोसळेल, असा अंदाज आहे.

शांघायची स्वतःची अशी एक अर्थसंस्कृती आहे, तिथे एक लॉजिस्टिक कल्चर आहे. स्वतःची अशी एक वृत्ती आहे. शांघाय हे एक संस्कृती जन्माला घेऊन आलेलं शहर आहे. त्यामुळे तिथे हा रोग पसरल्यानंतर आता काय हाहाकार झाला असेल, याचा अंदाज घेऊ शकतो. त्यात पुन्हा लोकल गव्हर्नमेंटवर वर्चस्व केंद्र सरकारचं. म्हणूनच चीनसाठी कोविड ही फक्त आरोग्यविषयक आपत्ती नाही. त्यांच्यासाठी ही राजकीय असंतोषाची पार्श्वभूमी बनली आहे. अर्थात तिथे कम्युनिस्ट पार्टीची पकड आहे. तिथे कोणत्याही विद्रोहाचा स्वर चालू दिला जाणार नाही. विद्रोहाचा स्वर पसरला नाही, पण कोविड इतर शहरांमध्ये पसरला तर… आताच बीजिंगमध्ये काही रुग्ण सापडलेत. त्यामुळे तिकडेदेखील खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जातेय. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था डामाडौल झाली आहे. पगारात कपात झाली आहे. अनागोंदी वाढली आहे. तुम्ही रहात असलेल्या बिल्डिंगमध्ये एखादा रुग्ण सापडला, तर हाहाकार माजतो, अशी परिस्थिती आहे. या सगळ्याचा विचार करता चीनमधून स्थलांतर करणं शक्य असलेले आता चीनमधून स्थलांतर करून इतर कुठल्या देशात राहता येते का, याचा विचार करत आहेत. आज चीनच्या बंदरावर, विशेषतः शांघायच्या बंदरावर अनेक बोटी आपला माल उतरवण्यासाठी समुद्रात रांगा करून उभ्या आहेत. संपूर्ण जगातल्या महत्त्वाच्या बंदरांवर ही परिस्थिती आहे. युरोपमध्येदेखील अनेक ठिकाणी हेच सुरू आहे. स्पेनमध्ये ट्रकचालकांचा मोठा संप चालू असल्यामुळे सर्व देवाण-घेवाण बंद पडली आहे. युरोपमध्येदेखील अनेक बंदरांवर बोटी रांगा लावून उभ्या आहेत. त्यामुळे चीनच्या निमित्ताने एकूणच लॉजिस्टिक मॅनेजमेंट क्षेत्रात हाहाकार माजला आहे.

साम्यवादाचा पुरस्कार करणाऱ्या चीनमध्ये श्रीमंतांना सर्व गोष्टी वेळेवर मिळत असून गरिबांना सापत्न वागणूक दिली जात आहे. आज चीनमध्ये अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांची मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत. तिथून तयार प्रॉडक्टदसचा पुरवठा न झाल्यामुळे युरोप, अमेरिका आणि आशियाच्या मार्केटमध्ये आज चीनचा थंडावलेला परफॉर्मन्स दिसतोय. त्यात पुन्हा राष्ट्राध्यक्ष शी-जीनपिंग हे २०२२ च्या अखेरीला आपल्या तिसऱ्या निवडणुकीसाठी सज्ज होणार आहेत. पुन्हा आपणच राष्ट्राध्यक्ष व्हावं, असं तर त्यांना निश्चितच वाटत असणार. पण त्यासाठीची पार्श्वभूमी फारशी योग्य नाही. झिरो कोविड ही पॉलिसी योग्य होती का?, याचा फैसला आज जगासमोर झालाय आणि ‘दो गज की दुरी है जरूरी’ असं म्हणणारा भारत या प्रक्रियेत यशस्वी झालाय, हाच या सगळ्याचा मतितार्थ.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -