मुंबई (प्रतिनिधी) : लाऊडस्पीकर्स ही खरी समस्या नाहीच. खरी समस्या ही समाजात विष कालवणाऱ्या रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या दहशतवादी संघटना आहेत. त्यांच्याविरोधात एकत्रपणे लढा देणे हीच काळाची गरज आहे. या संघटनांवर बंदी घालण्यासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच शांतता प्रस्थापित होईल, असे आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
आमदार नितेश राणे यांनी बुधवारी सकाळी तीन ट्वीट केले. त्यामधून त्यांनी भोंग्यांच्या मुद्द्यासोबतच राज्य सरकारवर देखील निशाणा साधला. यावेळी रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटनांवरदेखील बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून ठाम भूमिका घेतलेली असताना बुधवारी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अजानसमोर हनुमान चालीसा वाजवली जाणार या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटमुळे देखील चर्चा सुरू झाली.
दरम्यान, अशा संघटनांवरून नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. रझा अकादमी ही एक दहशतवादी संघटना असून तिची कोणत्याही धर्मादाय आयुक्तालयाकडे नोंद झालेली नाही. त्यांच्याकडे कोणताही नोंदणी क्रमांक नाही. तरी देखील राज्य सरकार त्यांना आंदोलन करण्याची आणि काम करण्याची परवानगी देते. त्यांना कुठून निधी मिळतो हे आपल्याला कसे कळणार? त्यांचे सर्व कामकाज ताबडतोब बंद व्हायला हवे”, अशी मागणीही आमदार नितेश राणे यांनी ट्वीटमधून केली आहे.