मुंबई (प्रतिनिधी) : टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये करण्याची मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे. गेल्या वर्षभरात सीएनजीच्या दारात प्रतिकिलो २५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे टॅक्सीचालकांचा व्यवसाय तोट्यात सुरू असून किमान भाडे ३० रुपये करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, महानगर गॅस लिमिटेडने नुकतेच सीएनजी दर प्रति किलो ७२ रुपयांवरून ७६ रुपये केले आहेत. या ४ रुपयांच्या दरवाढीने सीएनजी दरात गेल्या वर्षभरात २५ रुपयांची मोठी वाढ झाली असल्याने ‘एमएमआरटी’कडे वारंवार निवेदन दिल्यानंतरही दरवाढीबाबत अद्याप कोणताही निर्णय होत नसल्याने युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वॉड्रोस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आता सरकारने १५ मे पर्यंत टॅक्सी भाड्याचा आढावा घेण्याची मागणी केली असून किमान भाडे ३० रुपये करण्याची मागणी केली आहे.
मात्र जर सरकारकडून अधिकृत भाडेवाढ केली नाही, तर १ जूनपासून टॅक्सीचालक स्वतःच भाडेवाढ करतील, अशा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंग यांना लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे.