मुंबई : मशिदींवरील भोंग्यासंबंधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला असून बुधवारी संपूर्ण राज्यभरात आंदोलन होण्याची शक्यता आहे. हा मुद्दा वादग्रस्त ठरलेला असतानाच आता राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. २००८ मध्ये राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलनप्रकरणी सांगलीमधील शिराळा कोर्टाने हे अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.
विशेष म्हणजे ६ एप्रिलला हे वॉरंट काढण्यात आले आहे. मात्र एक महिना उलटल्यानंतरही पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. शिराळा कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, “सुप्रीम कोर्टाने पाच ते दहा वर्षांपूर्वीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश आहेत. त्यानुसार हे प्रकरण निकाली काढण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट पाठवले आहे”.
काय आहे २००८ सालचे हे प्रकरण
२००८ मध्ये रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेंवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडले होते.
विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह १० मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.