Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

मुंबई : राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या आहेत.

मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून ४ मे रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गृहमंत्र्यांसोबत बैठक पार पडल्यानंतर महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा दिला.

“गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यसाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंटक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे,” अशी माहिती रजनीश सेठ यांनी दिली.

“सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणं पोलिसांची जबाबदारी आहे. कोणीही ते बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे मी राज्यातील जनतेला आवाहन करतो,” असेही ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “औरंगाबादचे पोलीस आयुक्तांनी भाषणाचा अभ्यास केला आहे. त्यासंबंधी आवश्यक ती कारवाई करण्यासाठी ते सक्षम आहेत. जी कारवाई करायची आहे ते ती करतील”.

“कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करु. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक कारवाई केली असून नोटीस पाठवल्या आहेत. एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत,” असे रजनीश सेठ यांनी सांगितले.

१५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती रजनीश सेठ यांनी यावेळी दिली आहे.

Comments
Add Comment