मुंबई : औरंगाबादमधील सभेला ज्या अटी आणि शर्थी घातल्या होत्या तेव्हाच कळाले होते की हे सर्व गुन्हा दाखल करुन अटक करण्याचा डाव सुरू आहे. पण राज ठाकरे आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि महाराष्ट्र सैनिक साहेबांच्या आदेशांचे पालन करेल. जर राज ठाकरेंना अटक झाली तर मनसैनिक रस्त्यावर उतरेल, सरकारने तयार राहावे असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
“जर आम्हाला असे अन्यायकारकरित्या अडकविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सरकारने तयार राहावे. राज ठाकरेंना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरेल. आमच्यावर कितीही केसेस पडू द्यात आम्ही घाबरत नाही. आजही आमच्यावर अनेक केसेस आहेत. आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण साहेबांना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही”, असे संदीप देशपांडे म्हणाले.
मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनीही सरकारचा राज ठाकरेंना अटक करण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया दिली. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पुढची प्रक्रिया त्यांना अटक करण्याचीच असेल. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतली. आज त्यांच्याच मुलाचे सरकार आहे आणि भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंविरोधात जर असे षडयंत्र केले जाणार असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे अविनाश जाधव म्हणाले.