
मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व काय आहे? ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस...आयत्या बिळावरचा नागोबा’, अशा शब्दांत नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. राणेंना मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी कमावले ते उद्धव ठाकरेंनी गमावले. उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व काय आहे? उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस... ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदावर बसले. आयत्या बिळावरचा नागोबा. राज ठाकरेंना भोंगा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:चा भोंगा वाजवत आहेत. त्या माणसावर बोलण्यासारखे फार काही नाही’, अशी टीका राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ‘महाराष्ट्रदिनी राज्यातील जनतेला काय देणार ते बोलावे. गरिबी, निरक्षरता, रोजगार, दरडोई उत्पन्न यावर न बोलता उगीचच फुकटची बडबड. उद्धव ठाकरेंना राजकारण जमत नाही. मुख्यमंत्रीपदावर ते शोभत नाहीत. त्यांनी महाराष्ट्र १० वर्षे मागे नेला’, अशा शेलक्या शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.