डॉ. लीना राजवाडे
माणसाचे शरीर रसापासून बनलेले आहे. म्हणूनच त्या रसांचे पदार्थ नेहमी विचारपूर्वक खावे किंवा प्यावे. वाचक हो. नेहमी सर्व रसांचे पदार्थ खाण्यात ठेवल्यास पचनशक्ती चांगली राहते. आरोग्यही दीर्घकाळ चांगले राहण्यास मदत होते. आज आपण जाणून घेऊयात दुसरा महत्त्वाचा रस म्हणजे आम्ल किंवा आंबट रसाविषयी. पृथ्वी आणि अग्नी महाभूत प्रधान असणारा हा रस आहे.
अन्न पदार्थात हा रस रुची वाढवतो. वरण, भात, तूप, मीठ त्यावर लिंबू पिळले की तो खाताना जी स्वर्गीय चव आपण अनुभवतो हे याचमुळे. तोंडातील लालास्राव चांगला पाझरतो. तोंडातच अन्नपचनाला चांगली सुरुवात होते. Tastebuds active होतात. So, it helps as anappetizer. पृथ्वी आणि अग्नी महाभूत यांचे आधिक्य असल्याने स्निग्ध, उष्ण वीर्य, शीत, स्पर्श लघू या गुणांनी आम्ल रस शरीरात काम करतो. आंबट पदार्थ जिभेवरील tastebuds कसे ओळखतात, तर ते खाताना डोळे आणि भिवई यांचा संकोच होतो. दात अंबल्यासारखे होतात, अंगावर रोमांच उभे राहतात. मुख्य म्हणजे तोंडात स्राव निर्माण होतात आणि तोंड स्वच्छ वाटते. मधुर रस हा तोंडात स्रावाचे अनुलिम्पन करतो, तर आम्ल रस त्या रसाचे क्षालन करतो. जो पाचक रस सक्षम करण्यास मदत करतो. तोंडातच स्थूल आणि सूक्ष्म पचन दोन्ही एकाच वेळी सुरू होते. पाचक रस तोंडात स्रवायला लागल्याने स्निग्ध, लघू गुणामुळे अन्नाला ओलावा येतो. विघटन चांगले होते. पचनासाठी आणि एकूणच कोठेही न अडकता वायू वहनाचे काम चांगल्या पद्धतीने करतो.
शरीरातील रक्त धातूशी समान गुणधर्म असल्याने आम्लरसाचे प्रमाणात सेवन केल्यास रक्त चांगले राहते.
अयोग्य किंवा अति प्रमाणात सेवन केल्यास मात्र रक्त बिघडते. रक्त बिघडल्याने चक्कर येणे, डोळ्यांचे विकार, अंगाला खाज येणे. त्वचेचे विकार होऊ शकतात. हृदयाला उपयुक्त असणारा असा हा रस आहे. याचा अर्थ असा की, अन्नपचनानंतर तयार होणारे रक्त, मांस धातूचे पोषकांश चांगल्या प्रकारे निर्माण करण्याचे काम आम्ल रस करतो. त्यामुळे हृदयावर ताण येत नाही. मांसल अवयव आहे, त्याचेही आरोग्य चांगले राहायला मदत होते. ·नैसर्गिक आम्ल रसाचे पदार्थ-आवळा, चिंच, डाळिंब, चांदी, कैरी, चुका, कवठ, बोरं ही यादी नीट बघितल्यास लक्षात येईल की, यात फळांचा समावेश अधिक आहे.
आयुर्वेदानुसार, फळे ही जेवताना सुरुवातीला खाण्यास सांगितली आहेत. यामागील शास्त्रीय दृष्टिकोन आता समजेल. मुळात स्वस्थ माणसांनी, विशेष करून लोकांनीही याचा जरूर अवलंब करावा. चांदीचा विचारही लक्षात घेण्यासारखा आहे. स्वयंपाकासाठी वापरायची भांडी याविषयीही भारतीय वैद्यक शास्त्र किती सखोल विचार मांडते, हे यावरून लक्षात येते. दही लावताना चांदीच्या भांड्यात लावावे. दह्याचा आंबटपणा योग्य प्रमाणात राहतो. पाणी पिण्यासाठी चांदीचा पेला वापरावा जेवायलाही चांदीचे ताट वापरावे. अन्न निर्विष होण्यासाठी हे उपयोगी आहे. तेव्हा ज्यांना शक्य आहे, त्यांनी ही आरोग्यासाठी गुंतवणूक जरूर करावी. बँकेत लॉकरमध्ये ठेवू नयेत, रोज वापरावीत. आजची गुरुकिल्ली
आम्लो रस: अग्निं दीपयति
आम्ल रस पचन चांगले ठेवतो.
पुढील लेखात पाहू लवण रसाविषयी…