महाविकास आघाडी सरकारच्या जवळचे मानले जाणारे ३ उद्योगपती निशाण्यावर
मुंबई : सीबीआयच्या टीमकडून मुंबई आणि पुण्यातील बड्या उद्योगपतींशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यात अविनाश भोसले, शाहिद बलवा आणि विनोद गोयंका या उद्योजकांचा यामध्ये समावेश आहे. सीबीआयकडून सुरू असलेली ही छापेमारी बँक घोटाळ्याच्या तपासाच्या अनुषंगाने असल्याचे सांगितले जात आहे.
सीबीआय मुख्यालयातील टीमने मुंबई युनिटसह आज सकाळी राज्यातील दोन प्रमुख शहरांतील आठ ठिकाणी छापे टाकले. पुण्यात अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या परिसरात छापेमारी करण्यात आली. तसेच २जी घोटाळ्यात नाव आलेल्या शाहिद बलवा यांच्या कंपन्यांवरही छापे टाकण्यात आले. सीबीआयच्या टीमने ज्या तीन उद्योगपतींच्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत ते तीनही उद्योगपती राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे या कारवाईला राजकीय रंगही दिला जाण्याची शक्यता आहे.
अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम तसेच हॉटेल व्यावसायिक आहेत. तसेच ते कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरेही आहेत. अविनाश भोसले यांच्यावर ईडीने काही महिन्यांपूर्वी फेमा कायद्याअंतर्गत कारवाई करत जवळपास ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. पुणे आणि नागपूरमधील मालमत्तांचा यामध्ये समावेश होता. मुंबई आणि पुण्यात त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. पुण्यातच त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालयही आहे.