मुरबाड (प्रतिनिधी) :आजादी का अमृत महोत्सव विशेष किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियानांतर्गत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर संलग्न कृषी विज्ञान केंद्र, नागांव, ता. मुरबाड, जि. ठाणे व आत्मा ठाणे यांच्या वतीने डॉ. सुरेश द. जगदाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांच्यामार्फत नुकताच कृषी विज्ञान केंद्राच्या आवारामध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑनलाइन कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांनी तरुणांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीसाठी जास्तीत-जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीकडे वळावे जेणेकरून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल, जमिनीचे व मानवाचे आरोग्य चांगले राहील, अन्नामध्ये पोषक तत्त्वे वाढतील, यावर मार्गदर्शन केले. तसेच केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे व मुंबई बाजारपेठ जवळ असल्यामुळे त्याचा लाभ घेऊन ठाणे जिल्ह्यातला शेतकरी सक्षम झाला पाहिजे, असे कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.
सदर कार्यक्रमासाठी आ. किसन कथोरे, माजी आ. दिंगबर विशे, सुभाष घरत जि. प. सदस्य ठाणे, उल्हास बांगर जि. प. सदस्य ठाणे, स्वरा चौधरी सभापती, पंचायत समिती मुरबाड, बुधाजी बंगार संचालक, समता शेतकरी उत्पादक, गोकुळ जाधव, कुरले तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा, मुरबाड व कृषी सहाय्यक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कर्नल डॉ. आशीष पातुरकर, कुलगरू, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, डॉ. अनिल बिकाने, संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शेतकरी मेळाव्यास ३०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.