ठाणे प्रतिनिधी : ठाणे शहरातील अनेक प्रभागांत रस्त्यांवर वर्षानुवर्ष कित्येक भंगार गाड्या धूळखात उभ्या असतांना दिसून येतात. या गाड्यांमुळे रस्ते अडवले जातात. तसेच अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो. या विषयाची गंभीर दखल घेत माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले – जाधव यांनी ठाणे महापालिकेकडे पत्रव्यवहार करुन या गाड्या उचलण्याची मागणी केली होती. आज या भंगार गाड्यांवर पालिकेने कारवाई करत त्या पालिकेच्या मोकळ्या जागेत जमा केल्या. या कारवाईमुळे रस्ते मोकळे झाले असून नागरिकांना रस्त्यांवर चालणे सुकर झाले आहे.
ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक १९ मधील रस्त्यांवर वापरात नसलेल्या व धुळखात पडलेल्या खाजगी कार, रिक्षा, टुरिस्ट गाड्या यामुळे रस्ते अरुंद झाले होते. या गाड्यांच्या बाजुला मोठ्या प्रमाणात अच्छता होती. या बाबीची गंभीर दखल घेत माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले – जाधव यांनी १८ एप्रिल २०२२ रोजी नौपाडा- कोपरी प्रभाग समितीचे उपायुक्तांना एक लेखी पत्राद्वारे कारवाईची मागणी केली होती. त्यासोबत भंगार गाड्यांची छायाचित्रेही सादर केली होती.
या पत्राची दखल घेत आज सकाळ पासून या भंगार गाड्यांवर कारवाई करण्यात आली. प्रभागातील धुळखात पडलेल्या १५ गाड्या पालिकेने उचलून बाटा कंपाऊंड येथे महापालिकेच्या मोकळ्या जागेत जमा केल्या. या कारवाई मुळे आता रस्ते मोकळे झाले आहेत.