नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशात तीन हजार ३०३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ३९ जणांच्या मृत्युंची नोंद करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत कोरोना संक्रमण बाबत सावध रहाण्याचा इशारा काल दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पुन्हा बंधने नको असतील तर कोरोनाबाबत स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. असं असतांना पुन्हा एका देशातील दैनंदिन कोरोना बाधितांच्या संख्येने तीन हजारांचा आकडा पार केला आहे.
गेले महिनाभर देशात दैनंदिन कोरोना बांधितांची संख्या ही तीन हजार पेक्षा कमी नोंदली गेली होती, काही दिवस तर तो एक हजाराच्या खालीही आली होती. विशेषतः लोकसंख्येने मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रातही दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या सातत्याने १०० पेक्षा कमी नोंदवण्यात येत आहे.
असं असतांना काही राज्यात विशेषतः दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला अलर्ट करण्यात आलं आहे. देशात याआधी दैनंदिन चार लाखापर्यंत कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली असतांना तुलनेत तीन हजार बाधितांची संख्या ही खूपच कमी आहे. असं असलं तरी सर्व बंधने काढून टाकण्यात आली असतांना, सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले असतांना पुन्हा एकदा बंधने घालण्याची वेळ यायला नको यासाठी पंतप्रधान मोदींसह मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.