पुणे (हिं.स) : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा हंगामी पिकांवर झालेला असला तरी उसाच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. याशिवाय क्षेत्र आणि साखरेचा उताराही वाढला आहे. त्यामुळेच यंदा उसाचे गाळप आणि साखरेचे विक्रमी उत्पादन मिळणार आहे. चालू हंगामात आतापर्यंत ९५ लाख टन साखरेची निर्यात या विभागातून झाली आहे.
शिवाय सध्याही ऊस गाळप हे सुरुच आहे. केवळ पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने हा बदल झाला आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रात नाहीतर मराठवाड्यात देखील ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्येही साखरेचा उत्पन्नातील गोडवा वाढला आहे. शिवाय साखर उद्योगांनाही अच्छे दिन आले आहेत. यंदा ऊसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन वाढले असले तरी विक्रमी क्षेत्रावर अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील उसाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी मराठवाड्यातील जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात ऊस हा फडातच उभा आहे. १२ महिन्याचा कालावधी संपूनही ऊसतोड न झाल्याने उत्पादनात घट होत आहे. शिवाय अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार की नाही असा सवालही शेतकरी उपस्थित करीत आहेत.