
बोईसर (वार्ताहर) : एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाचा संघर्ष न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचारी कामावर हजर झाल्याने संपला असून पालघर विभागातील एसटी आगारातूनही एसटी बस वेगाने पळू लागली आहे. दोन दिवसांमध्ये दोन लाखांच्या आसपास किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. यामुळे साधारणपणे ४५ लाख रुपये रोख उत्पन्न प्राप्त झाले आहे. तसेच चार ते पाच लाख रुपये प्रतिकृतीचे मिळाले आहेत. तसेच दिवसेंदिवस उत्पन्नाचा आकडा वाढत जाणार असल्याचेही पालघर विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पालघर विभागातील आठ आगारांतील लांब व मध्यम पल्ल्यांच्या येऊन जाऊन १३२ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. पालघरवरून दररोज स्थानिक २१६ फेऱ्या, सफाळे येथून १९४ फेऱ्या, वसई आगारातून २०८ फेऱ्या, अर्नाळा येथून १७४ फेऱ्या, डहाणू आगारातून ७६ फेऱ्या, जव्हार येथून ५० फेऱ्या, बोईसर आगारातून २३० फेऱ्या, तर नालासोपारा आगरातून २१६६ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. अशा एकूण ४२० बसेस धावण्यास सुरुवात झाली आहे.
१८८० कर्मचारी हजर
न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना केल्याने पालघर विभागात १८८० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, तर केवळ सात कर्मचारी अजूनपर्यंत कामावर हजर व्हायचे बाकी आहेत.