Thursday, May 15, 2025

कोलाज

आकर्षणाच्या प्रेमाला अनैतिक संबंधाचे गालबोट

अॅड. रिया करंजकर


प्रेम हे आंधळे असते, असे लोक म्हणतात. पण ते तितकेच खरे आहे. समाजात आपण ज्या प्रेमीयुगुलांना बघतो तेव्हा असे आपल्याला वाटते की, काय बघून याने प्रेम केले. शेवटी म्हणतात ना प्रेम हे आंधळे असते. प्रेमात आणि युद्धात सगळ्या गोष्टी माफ असतात, असेही म्हटले जाते. पण जेव्हा कायद्याचा बडगा प्रेमावर पडतो. त्यावेळी कुणी ना कुणी प्रेमाच्या दुनियेतून बरबाद होतो.


भिवंडी तालुक्यात घडलेली ही सत्य घटना असून उदय हा उत्तर प्रदेशचा अविवाहित तरुण नोकरीनिमित्त मुंबई शहरात आला. त्याला भिवंडी या ठिकाणी नोकरी मिळाली. नोकरी तिथे त्याने राहण्यासाठी घर शोधण्यास सुरुवात केली. आपले जातबांधव जिथे आहेत, त्याच ठिकाणी त्यांना घर मिळावे, असे त्याला वाटू लागले. अडीअडचणीला आपले जातबांधव मदतीला येतील, या उद्देशाने त्याने आपले जातबंधू ज्या वस्तीत राहतात, त्या वस्तीमध्ये एक घर भाड्याने घेतले व त्या ठिकाणी तो राहू लागला. आजूबाजूला असलेल्या लोकांशी त्याची हळूहळू ओळख होऊ लागली आणि अशातच जयसिंगसोबत त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर एका चांगल्या मैत्रीमध्ये झाले.


मैत्रीमुळे उदयचे जयसिंगच्या घरी येणं-जाणं सुरू झाले. जयसिंग आपली आई, पत्नी यांच्यासोबत राहत होता. तो कामाला जात होता आणि त्याच्या घरामध्ये फक्त आई आणि त्याची पत्नी असायची. घरात काही काम नसल्यामुळे त्याची आई नातेवाइकाकडे, लोकांकडे जात असे आणि असे करता करता जयसिंगची पत्नी रेखाबरोबर उदयचे बोलणे-चालणे होऊ लागले. जयसिंग कामावर गेल्यावर उदय त्यांच्या घरी येऊन त्यांच्याशी गप्पा मारायला लागला. एक मैत्रीचे नाते त्यांच्यामध्ये निर्माण झाले. जयसिंगची आई वयस्कर असल्यामुळे घरात कंटाळा येतो म्हणून ती जास्तीत जास्त वेळ बाहेर असे. उदयचे जयसिंगच्या घरी दिवसेंदिवस येणे-जाणे वाढले आणि रेखासोबत असलेल्या ओळखीचे, मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. एकमेकांबद्दल जास्त आकर्षण त्यांना वाटू लागले. जयसिंग कामानिमित्त बाहेर असायचा. आई अधिकाधिक वेळ घराबाहेर असायची. दरम्यान, रेखा व उदय यांनी प्रेमाची मर्यादा ओलांडली आणि त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.


उदय आपल्या घरी सतत का येतो? दिवस दिवसभर आपल्या घरी का असतो? असे काही काळानंतर जयसिंगच्या आईच्या लक्षात आले. तिला दोघांबद्दल संशय येऊ लागला. म्हणून एक दिवस तिने बाहेर जाते, असे सांगून बाहेर न जाता शेजारच्या घरात जाऊन बसली. जयसिंगची आई बाहेर गेलेली कळताच उदय हा जयसिंगच्या घरी आला. थोड्या वेळानंतर जयसिंगच्या आईने आपल्या घरातील खिडकीतून वाकून बघितले असता तिची सून रेखा आणि उदय यांच्यामध्ये चाललेले प्रेमाचे चाळे पाहायला मिळाले. तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आपली सून एवढं काही करू शकेल, असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. ती त्यावेळी गप्प बसली. काहीच बोलली नाही. आपण बाहेर आहोत, याची चाहूल त्यांनी त्या दोघांना लागू दिली नाही. पण आपल्या मुलाला हे कसं सांगायचं, असा प्रश्न तिला पडला.


आपल्या मुलाचा संसार आपल्या डोळ्यांसमोर बरबाद होताना जयसिंगची आई पाहत होती. पण दोन-तीन दिवसांनी विचार करून तिने आपल्या मुलाला विश्वासात घेऊन या साऱ्या गोष्टी सांगितल्या. जयसिंगचा त्यावर विश्वास बसेना. कारण त्याचं आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम होते. आई सांगते म्हणून त्याने आईवर विश्वास ठेवला आणि आई जे सांगेल, ते करायचं त्याने ठरवले. एक दिवस जयसिंग आणि आई घरातील सामान खरेदी करण्याचे सांगून घराबाहेर गेले. सामान आणायला न जाता शेजारच्या घरात जाऊन बसले. थोड्या वेळाने उदय आपल्या घरी आला, हे जयसिंगने बघितले. काही वेळ गेल्यानंतर जयसिंगची आई व जयसिंग यांनी खिडकीतून आपल्या घरात डोकावून पाहिले असता त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. आपला मित्र आपल्या पत्नीसोबत प्रेमाचे चाळे करत आहे, हे बघितल्यावर त्याचाही स्वतःवरील विश्वास उडाला. पण त्याने बघितले होते ते सत्य होते. या परिस्थितीमध्ये जयसिंगच्या आईने आपल्या मुलाला सावरण्याचा प्रयत्न केला.


जयसिंगने त्याच्या पत्नीला त्या दिवशी उदय आणि तिच्यातील संबंधाबद्दल विचारले असता तिने साहजिकच नकार दर्शवला. पण झालेला घटनाक्रम सांगितल्यावर रेखाने ही गोष्ट मान्य केली. माझ्याबरोबर नांदायचे असेल, तर तू उद्या उदय विरुद्ध बलात्काराची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल कर, असे जयसिंगने रेखाला बजावले. रेखाला आपला संसार मोडायचा नव्हता आणि नवऱ्याच्या धमकीला घाबरून व नवऱ्याला आता सगळं समजलेले आहे, हा विचार करून तिने उदयविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. माझ्या मैत्रीचा गैरफायदा उचलून तसेच नवऱ्याला मारण्याची धमकी देत तो माझ्यावर बलात्कार करत राहिला, असे रेखाने तक्रारीत नोंदवले. केस दाखल झाली आणि पोलिसांनी उदयला पकडले. कोर्टाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली. उदय सध्या जेलमध्ये शिक्षा भोगतोय आणि इकडे पत्नीने चूक केलेली आहे. ती परत असे वागणार नाही ना? असा प्रश्न जयसिंगला पडला आहे. अशा पत्नीवर आपण का विश्वास ठेवायचा म्हणून त्यानेही आपल्या पत्नीविरुद्ध कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केला. प्रेम आंधळे असते हे खरेच आहे. कारण अशा अनैतिक संबंधातून तिघांची आयुष्ये बरबाद झाली. आकर्षण माणसाला कुठून कुठे नेऊन ठेवते, याचा काही भरवसा नाही.


(कथा सत्यघटनेवर आधारित असून नावे बदललेली आहेत)

Comments
Add Comment