Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

राष्ट्रपती राजवट राज्यात येणे गरजेचे

राष्ट्रपती राजवट राज्यात येणे गरजेचे

पुणे (प्रतिनिधी) : “जेव्हा राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित सांभाळत नाही. सुडाचे राजकारण करतात. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट राज्यात येणे गरजेचे आहे”, असे नारायण राणे म्हणाले. पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शनिवारी दिवसभर शिवसेना कार्यकर्ते मातोश्रीबाहेर आणि राणा दाम्पत्याच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होते. अखेर दुपारी मातोश्रीवर न जाताच आंदोलन संपवत असल्याचं राणा दाम्पत्यानं जाहीर केलं. मात्र, यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून आता त्यांची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले.

यावेळी बोलताना नारायण राणेंनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर शनिवारी रात्री झालेल्या दगडफेकप्रकरणी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली. “राज्यात बेबंदशाही चालू आहे. जे सत्तेत आहेत, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्यांचेच कार्यकर्ते धांगडधिंगा, मारझोड करत आहेत. एका व्यक्तीला मारायला ७०-८० लोक येतात. तेही एक राजकीय पुढारी आहेत. किरीट सोमय्या पोलीस स्थानताच्या आवारात असताना ७०-८० लोक त्यांच्यावर पोलिसांच्या साक्षीनं दगडफेक करतात. कसला कायदा आणि सुव्यवस्था?” असे राणे यावेळी म्हणाले.

हनुमान चालीसा पठणाला विरोध का?

“देशात लोकशाही आहे. ते जर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी पुढे येत असतील, तर त्याला विरोध का? शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला, तेव्हा किती एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली. मग अमरावतीमध्ये राणांच्या घरात घुसून मारहाण झाली. तेव्हा त्यांना का अटक होत नाही? तीच कलमं का लावली जात नाहीत? एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्याला दुसरा असे का? हा पक्षपात सरकार का करतेय? या सगळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत. त्यांचं कुणावरही नियंत्रण नाही”, असे देखील नारायण राणे म्हणाले.

राज्याला १० वर्षे मागे नेले

या राज्याला मुख्यमंत्र्यांनी विकासाच्या बाबतीत १० वर्षे मागे नेले. ८९ हजार कोटी राजकोषीय तूट या राज्याची आहे”, अशा शब्दांत नारायण राणेंनी टीका केली.

Comments
Add Comment