
कल्याण (प्रतिनिधी) : जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीकरांना पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन करण्यासाठी जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण दक्षता मंडळ, श्री लक्ष्मी नारायण संस्था, ऊर्जा फाऊंडेशन, सेव्ह सॉइल असोसिएशन आणि स्वच्छ डोंबिवली अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने पोवाडे, घोषणा, पथनाट्य आणि उपस्थितांशी संवादाच्या माध्यमातून रोटरी उद्यान आणि नाना-नानी पार्क, डोंबिवली येथे जनजागृती करण्यात आली.
या जनजागृती उपक्रमात सहाय्यक आयुक्त राजेश सावंत आणि प्रोफेसर डॉ. अंजली रत्नाकर यांनी उपस्थित डोंबिवलीकरांना मार्गदर्शन केले. या जागतिक वसुंधरा दिनाच्या मुहूर्तावर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारून आपल्या येणाऱ्या भावी पिढीस स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी जीवन जगण्यास सहाय्यकारी वातावरण निर्माण करू या! अशी शपथ उपस्थित पर्यावरणप्रेमींनी घेतली. तसेच प्लास्टिकमुक्त आणि सुंदर हरीत डोंबिवलीसाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे या वेळी सांगण्यात आले.