मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसैनिकांनी राज्यात आक्रमक निदर्शने सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी थेट राणा दाम्पत्य राहत असलेल्या ठिकाणी धडक दिली. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला असतानाच मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे एक ट्वीट करत शिवसेना ट्रॅपमध्ये अडकत असल्याचे म्हटले आहे.
‘शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली आहे, एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहे,’ असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
शिवसेना पूर्णपणे ट्रॅप मध्ये फसत चालली आहे,एका महिन्यात दोन खासदारांच्या घरावर हल्ला झाला आहे. स्वतःहून राष्ट्रपती राजवटीचा मार्ग तयार करत आहेत
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 23, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले आक्रमक आंदोलन, भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्री परिसरात करण्यात आलेला हल्ला आणि इतर काही घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच भाजपच्या काही नेत्यांनी तर थेट केंद्र सरकारकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या राड्याचा धागा पकडत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी शिवसेना ट्रॅपमध्ये अडकत असल्याचा दावा केला आहे.
राज्यातील घटनांवरून शिवसेनेवर टीका करत असताना संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा मशिदीच्या भोंग्यांवर भाष्य केले आहे. ‘तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवले काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नको आहे. आम्ही काय चुकीचे बोलत आहोत? न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.