मुंबई : “Enough is Enough! आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी… जय महाराष्ट्र!!” असे ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत हे राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता शिवसेना राणा दाम्पत्याविरोधात आणखी एखादे आक्रमक पाऊल उचलणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
Enough is Enough!
आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी…
जय महाराष्ट्र!!— Sanjay Raut (@rautsanjay61) April 23, 2022
तत्पूर्वी संजय राऊत यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणा दाम्पत्यावर टीका करत असताना राऊतांनी भाजपवरही आगपाखड केली होती. आम्हाला धमक्या देऊ नका. राष्ट्रपती राजवट लागेल, केंद्रीय तपास यंत्रणा येतील, या धमक्या देऊ नका. हिंमत असेल तर सीबीआय लावा, ईडी लावा. आम्हाला त्रास द्या. आम्ही तुम्हाला घाबरत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
‘कोणाच्या तरी पाठिंब्याने तुम्ही मुंबई येऊन मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक काय शांत बसणार आहेत का? कायदा-सुव्यवस्थेबाबत तुमच्याकडून सल्ले ऐकून घ्यावेत, अशी वेळ सरकारवर आलेली नाही. तुम्ही तुमच्या पात्रतेत राहा,’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या खारमधील घराबाहेर शिवसैनिक सकाळपासून आक्रमक आंदोलन करत आहेत. शिवसैनिकांनी सध्या राणा दाम्पत्य राहत असलेल्या निवासस्थानाला वेढा घातला आहे. राणा दाम्पत्याला डिवचण्यासाठी या परिसरात शिवसैनिकांनी एक रुग्णवाहिका आणली आहे. या रुग्णवाहिकेवर ‘रिझर्व्हड फॉर बंटी-बंबली’, असा फलक लावण्यात आला आहे.