शहापूर (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्यातील पहिला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शहापूर तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायतीमध्ये कार्यान्वित होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून नागरी सुविधा योजनेंतर्गत ६९ लाख १६ हजार ७९३ इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, तर ग्रामपंचायतीकडून २४ लाख ३४ हजार रुपयांचा पहिला हप्ता कंपनीच्या बँक खाती जमा केल्याची माहिती तत्कालीन ग्रामसेवक शरद फर्डे यांनी दिली.
या ग्रामपंचायत हद्दीमध्ये २५ हजारांहून अधिक लोकवस्ती वास्तव्यास आहे. ग्रामपंचायत प्रशासन सफाई कामगारांमार्फत दैनंदिन जमा होणारा कचरा मानस मंदिर रस्त्याला भारंगी नदिपात्रालगत असलेल्या मासिक भाडेतत्वावर एका खासगी जागेत संकलित करत आहे. सदर कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे तसेच जमा झालेला कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.
नदीपात्रालगत कचरा टाकल्यामुळे जलप्रदूषणही होत आहे. या सर्व घटनेची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळ कल्याण विभागाने आसनगाव ग्रामपंचायतीस नोटीस देऊन कचऱ्याची विल्हेवाट करावी, अशी लेखी सूचना दिली आहे.
या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी जि. प. सदस्य मधुकर चंदे व तत्कालीन ग्रामसेवक शरद फर्डे यांनी विकासात्मक आराखडा तयार करून नागरकांकडून निर्माण होणारा कचरा हा कचरा नसून कचऱ्यातून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा संकल्प केला.
या प्रकल्पासाठी त्यांनी निधीची उपलब्धता जिल्हा परिषद ठाणे यांचकडून नागरी सुविधा योजने अंर्तगत ६९ लाख १६ हजार ७९३ इतका निधी उपलब्ध केला. त्या आनुषंगाने ई टेंडर प्रक्रियेद्वारे शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनेनुसार कचऱ्यापासून खत करणाऱ्या मशीनची खरेदीही
केली आहे.
सदर मशीन बसविण्यासाठी आसनगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये ४५ हून अधिक राखीव भूखंड उपलब्ध असून यापैकी सात जागा ग्रामपंचायत प्रशासनाच्या मालकी हक्काच्या असल्याने खतनिर्मिती करण्यासाठी जागेचा प्रश्नही सुटलेला आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ही काळाची गरज आहे. याकामी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास नक्कीच मदत होईल. – भास्कर रेंगडे, गटविकास अधिकारी, शहापूर