
श्री भालचंद्र महाराजांच्या काही थोर भाविक भक्तांच्या मनात आले की, श्रीबाबांनी आपले सारे आयुष्य अगदी कारावासात घालविले; परंतु आता त्यांच्या पुढील आयुष्यात तरी त्यांनी आरामात स्वत:च्या मंदिरात आपले पवित्र वास्तव्य करावे. या थोर सद्हेतूने श्री बाबांच्या अनेक भक्तांच्या सहाय्याने सुमारे एक लाख रूपये खर्चून ‘श्री भालचंद्र महाराज आश्रम’ नावाची एक आधुनिक पद्धतीची सुंदर इमारत बांधली आहे. त्या मंदिरात श्रीबाबा केव्हातरी चुकून एखाद्या कोपऱ्यात आढळत. कारण ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचे म्हणजे ‘हे विश्वचि आपण जाहला’ अशा अवस्थेला जाऊन पोहोचलेल्यांना मंदिरात काय किंवा झोपडीत काय सर्व समान!
श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकोबांना काय थोडे जडजवाहिर पाठविले होते? परंतु त्यांनी ते साभार परत केले आणि आपण आयुष्यभर फुटक्या विण्यावर भजन करीत राहिले. तसेच श्रीगाडगेबाबांनी गोरगरिबांसाठी लाखो रुपयांच्या राजवाड्यासारख्या धर्मशाळा बांधल्या, पण आपण मात्र अंगात फाटक्या चिंध्या घालून एका साध्या चंद्रमौळी झोपडीत रहात असत. संत हे असेच त्यागी असतात. श्रीभालचंद्र महाराज त्या लाख रुपयांच्या आश्रमापेक्षा समाधीच्या पडवीत जास्त रंगत व नामस्मरणात दंग होत असत.
(क्रमश:)
- राजाधिराज श्री भालचंद्र महाराज की जय!