मुंबई (प्रतिनिधी) : लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मंगळवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सचा माजी कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूवर खाते न खोलता बाद झाला. त्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहलीला क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामामध्ये कर्णधारपद सोडूनही विराट कोहलीची खराब कामगिरी अद्यापही सुरूच आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीने फारशी चांगली केलेली नाही. टीम इंडियासाठी सुरू असलेला त्याचा खराब फॉर्म बंगळूरु रॉयल चॅलेंजर्ससाठी खेळतानाही सुरूच आहे. बायो बबल पहिल्यांदा सुरू झालं, तेव्हा मी प्रशिक्षक होतो. बायो बबलमध्ये कसं वातावरण असतं, ते मी पाहिलं आहे.
त्यामुळे मला स्पष्टपणे वाटतं की खेळाडूंबद्दल सहानुभूती दाखवावी लागेल. मी थेट मुख्य खेळाडूबद्दल बोलतो. विराट कोहली गेल्या दोन वर्षांत खूप काळ क्रिकेट खेळतोय. तो आता क्रिकेट खेळून खेळून अक्षरश: कंटाळला आहे. त्यामुळे जर कोणाला विश्रांतीची आवश्यकता असेल, तर तो म्हणजे विराट कोहली. त्याला दीड किंवा दोन महिन्यांच्या ब्रेकची गरज आहे. मग तो इंग्लंड दौऱ्यानंतर असेल किंवा इंग्लंड दौऱ्यापूर्वी असेल, असे शास्त्री म्हणाले.
विराट कोहली हा एक अतिशय प्रतिभावान क्रिकेटपटू आहे. त्याच्यात अजूनही किमान सहा ते सात वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे त्याला आताच इतक्या मोठ्या स्तरावर मानसिक थकवा योग्य नाही. अशाने त्याच्यातील क्रिकेटवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे, असे शास्त्रींनी पुढे म्हटले.