भिवंडी (वार्ताहर) : खाद्यपदार्थ साठविलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास घडली. या आगीत तीन गोदाम जळून खाक झाले आहेत.
तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील गौरीबाई कंपाऊंड परिसरात खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागणारे पदार्थ व पावडर साठवून ठेवलेल्या गोदामात सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत तीन गोदाम जळून खाक झाले. ही आग इतकी भयानक होती की, आसपासच्या गोदामांनाही धोका निर्माण झाला होता.
या गोदामात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ, मेवा रोल, एडमुल, सिपी १३५, सोडियम ट्रायचे पावडर बॅग साठवणूक करण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले आहे. या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. या आगीच्या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.