Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीतर मुंबई पोलीस ५ मिनिटांत पोहोचतील

तर मुंबई पोलीस ५ मिनिटांत पोहोचतील

राज ठाकरेंच्या अल्टीमेटमवर पोलिसांचा थेट इशारा

मुंबई : मशीदींवरील भोंगे ३ मे पर्यंत काढून टाका, नाहीतर आम्ही त्या मशीदींसमोर हनुमान चालिसा भोंग्यावर लावू असा इशारा देत राज्यात नव्या वादाला तोंड फोडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांनी थेट इशारा दिला आहे. मुंबई पोलीस कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहेत. फक्त पाच मिनिटांत मुंबई पोलीस कोणत्याही घटनेच्या ठिकाणी पोहोचू शकतात. शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील क्षेत्रे ठरविण्यात आली आहेत. तिथे २४ तास गस्त घालण्यात येत आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दुसरीकडे राज ठाकरे आणि मनसे नेते भोंगा बंदीच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मुंबईतील पाडवा मेळाव्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेत आणि  पुण्यातील सभेतही राज ठाकरेंनी ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे. तर येत्या १ मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेवरून राजकारण तापले आहे. मनसेला हवे असलेले मैदान देण्यास प्रशासनाने नकार दिला आहे, त्याऐवजी अन्य मैदानांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचे आयोजन करण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ५ जूनला राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी पोलीस तयार आहेत, असा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यातच आता मुंबई पोलिसांनीही आम्ही ५ मिनिटांत पोहोचू, असे म्हटल्याने राज्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -