Thursday, May 15, 2025

महामुंबई

नवी मुंबईतील गतिरोधक पांढऱ्या पट्ट्यांपासून वंचित

नवी मुंबईतील गतिरोधक पांढऱ्या पट्ट्यांपासून वंचित

नवी मुंबई (प्रतिनिधी) : शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा पुनर्विकास चालू आहे, तर मुख्य रस्ते प्रशस्त व सिमेंट काँक्रीटचे केले जात आहेत. यामुळे वाहनचालक भरधाव वाहने हाकत आहेत. वेगावर प्रतिबंध राहत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत म्हणून गतिरोधकांची निर्मिती केली आहे. पण गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले नसल्याने आता वाहन आपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.


नवी मुंबईमधील एमआयडीसी, बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, ऐरोली, घणसोली, दिघा, कोपरखैरणे या आठही विभाग कार्यालय क्षेत्रांतील अंतर्गत व मुख्य रस्ते चकाचक केले गेले आहेत; परंतु बेफिकीर दुचाकी, चारचाकी, रिक्षाचालक वाहने भरधाव हाकत आहेत. यावर उपाय म्हणून गतिरोधकांची बांधणी पालिकेकडून करण्यात आली; परंतु गतिरोधकांची निर्मिती करताना चालकांच्या लक्षात येऊन ते दिसावेत यासाठी पांढरे पट्टे मारणे अनिवार्य आहेत, मात्र ते मारले नसल्याने अपघात होत आहेत.


सारसोले स्मशानभूमीकडून जुईनगर सेक्टर २३ कडे येताना नर्सरीच्या पुढे दोन महिन्यांपूर्वी गतिरोधक बांधले. पण अजून पांढरे पट्टे मारले नाहीत. याविषयी प्रशासनाला कळवूनही कार्यवाही केली गेली नाही. हीच परिस्थिती सर्व शहरात आहे.


- श्रीधर मढवी, सामाजिक कार्यकर्ते, नवी मुंबई

याबाबतीत सर्वच कार्यकारी अभियंत्यांना सूचना दिल्या जातील. त्यानंतर कार्यवाही केली जाईल.


- संजय देसाई, शहर अभियंता, पालिका
Comments
Add Comment