मुंबई (प्रतिनिधी) : लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, गाड्यांसह प्लॅटफॉर्मची सुरक्षा, स्वच्छता आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईहून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढवणे या मागण्यांसंदर्भात मंगळवारी मुंबई भाजप उपाध्यक्ष अमरजित मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मध्य आणि
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांची भेट घेतली. लाहोटी यांनी याबाबत तत्काळ दखल घेत प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, अतिरिक्त शौचालये, सुरक्षा आणि विद्युत रोषणाईची योग्य व्यवस्था करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.
यावेळी मिश्रा म्हणाले, मुंबईहून कोकण, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड (हरिद्वार), गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल यासह उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने उन्हाळी सुट्टी निमित्त स्पेशल
ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.
पण ती अपुरी आहे आणि स्पेशल ट्रेन कायम चालवण्याची मागणी होत आहे. सुट्टीच्या कालावधीत रेल्वे प्रवासात वाढ होत असली तरी मुंबईहून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या काळात विशेष गाड्या चालवल्या गेल्या आणि उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये काही जादा डबेही बसवले तर ते अधिक सोयीचे होईल.
त्यासाठी विशेष गाड्यांची घोषणाही लवकरच करावी, गाड्यांचे भाडेही नेहमीच्या गाड्यांप्रमाणेच ठेवावे, लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे असेही मिश्रा म्हणाले.
कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर, माजी नगरसेवक शिवकुमार झा, उत्तराखंड सेलचे अध्यक्ष महेंद्रसिंग गोसाई, गुजरात सेलचे अध्यक्ष संजीव पटेल, राजस्थान सेलचे सरचिटणीस ईश्वर सिंह आदी यावेळी उपस्थित होते.