मुंबई : महाराष्ट्रात सध्या काही समाजकंटक जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकतात. यामुळे सुरू असलेला जातीय वाद लक्षात घेऊन सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणा-यांना लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून विशेष सॉफ्टवेअर टूल्सचा वापर केला आहे. सोशल मीडियावर जर तुम्ही जातीय पोस्ट करत असाल, तर तुम्हाला तुमच्या इनबॉक्समध्ये सायबर पोलिस सीआरपीसी च्या कलम १४९ अंतर्गत एक नोटीस पाठवण्यात येत आहे. सायबर पोलिसांकडून आतापर्यंत अशा ४०० नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र सायबर सेलचे पोलिस महानिरिक्षक यशस्वी यादव म्हणाले की, गेल्या १५ दिवसांत जातीय पोस्टमध्ये तिपटीने वाढ झाली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे, आम्ही त्यावर लक्ष ठेवले आहे. महाराष्ट्र सायबरने गेल्या चार महिन्यांत १२ हजारांहून अधिक पोस्ट डिलीट केल्या असून संबंधितांपैकी ३०० जणांवर एफआयआर दाखल केला आहे. मशिदीवरून लाऊडस्पीकरचा वाद सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर जातीय पोस्टचे प्रमाणही वाढले असून त्याचा परिणाम सध्याच्या किंवा भविष्यात राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर होऊ शकतो.
या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबरने चार विशेष टीम तयार केल्या आहेत, जे सोशल मीडियाच्या पोस्टवर लक्ष ठेवून आहेत, त्यांच्या युनिटला “सोशल मीडिया मॉनिटरिंग अँड अॅनालिसिस युनिट” असे नाव देण्यात आले आहे आणि हे करण्यासाठी काही खास सॉफ्टवेअर टूल्सचाही वापर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सायबरने आतापर्यंत हजारो पोस्ट शोधून काढल्या असून अशा पोस्ट काढून टाकण्यासाठी आणि अशा पोस्टमागील लोकांवर दोन प्रकारची कारवाई करण्यात आली आहे, प्रथमतः त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या नोडल अधिकाऱ्यांना पत्र लिहून पोस्ट डिलीट करण्यात येत आहे. याशिवाय त्या प्रोफाइलची सर्व माहिती मागितल्यानंतर संबंधित सायबर युनिटला त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले जात आहे