नवी मुंबई (प्रतिनिधी) : तुर्भे येथील जनता मार्केट काही घटकांमुळे समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मनस्ताप होत आहे. या समस्येवर संबंधित प्रशासनाने कडक धोरण राबवून मार्ग काढावा, अशी मागणी खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक करत आहेत.
तुर्भे गाव व वाशी सानपाडा रेल्वे ट्रॅकच्या मध्ये तुर्भे जनता मार्केट आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे घरगुती साहित्य ग्राहकांना अपेक्षित दराने मिळत असल्याने नवी मुंबईमधील ग्राहकांचा ओढा या मार्केटकडे नेहमीच पाहायला मिळत आहे. त्यामुळे साहजिकच ग्राहकांची पावले या बाजाराकडे वळताना पाहायला मिळत आहेत; परंतु मार्केटमध्ये व्यावसायिकांकडून झालेले अतिक्रमण व वाहन चालकांनी उभी केलेली वाहने यामुळे हा बाजार समस्येच्या गर्तेत अडकला आहे.
तुर्भे जनता मार्केट ज्या बाजाराला समजले जाते, तेथे बैठे गाळे रस्त्याच्या दोन्हीही बाजूला आहेत, मधोमध जो रस्ता आहे. त्याची रुंदी पंधरा फूटही नाही. यामुळे खरेदीसाठी आलेले ग्राहक आपली चारचाकी, तीनचाकी व दुचाकी रस्त्यांच्या दुतर्फा बिनधास्तपणे उभी करतात. यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना मोठा त्रास होत असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्यास मदत होत आहे. यावर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारणे अत्यंत अत्यावश्यक असल्याचे ग्राहक तुषार भालेकर यांनी सांगितले.
तुर्भे मार्केटमध्ये जे व्यवसायासाठी गाळे आहेत. त्या गाळ्यांसमोर ग्राहकांना साहित्य खरेदी करण्यासाठी समासी जागा सोडली आहे; परंतु या समासी जागेवर आर्थिक उत्पन्न जादा व्हावे. या स्वार्थासाठी समासी जागा अतिक्रमित केली आहे. यामुळे ग्राहकांना रस्त्यावर उभे राहून साहित्य खरेदी करावे लागत आहे.
आम्ही आमच्या हद्दीत किमान तीनशेपेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करतो. आमची कारवाई नियमित चालू आहे. तसेच तुर्भे मार्केटमधील बाजारावर विशेष लक्ष ठेवले जाईल. तसेच नियमबाह्य पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई केली जाईल.
– अतुल अहिरे, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग
नियमबाह्य वागणाऱ्या व्यावसायिकांवर अतिक्रमण विभाग नियमित कारवाई करत असते. यापुढेही सातत्य राखले जाईल. – सुबोध ठाणेकर, सहाय्यक आयुक्त, तुर्भे