नाशिक : मशिदीवरील भोंगे काढले नाहीतर त्यांच्या समोर हनुमान चालीसा लावू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मात्र नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी सर्व धर्मीय प्रार्थना स्थळांना भोंगे लावण्यासाठी रितसर परवानगी घ्यावी लागेल, असे आदेश जारी केले आहेत.
मशिदीपासून शंभर मीटरच्या आत पाच वेळेच्या नमाजाच्या वेळी कुणालाही भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणता येणार नाही. ज्यांना शंभर मीटर दूर अंतरावर म्हणायचं असेल त्यांना ३ मे पर्यंत परवानगी घ्यावी लागणार आहे.
सोबतच ध्वनी प्रदूषणाविषयी नियमाचे पालन करून हनुमान चालीसा किंवा नमाज पठण करावे लागणार आहे. या साठी आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे. हनुमान चालीसासाठी परवानगीशिवाय कोणालाही भोंगे लावता येणार नाही.
भोंगे लावण्याच्या नावाखाली कोणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थेट चार महिने तुरुंगवासाची शिक्षा याशिवाय शहरातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी घेतलेला हा निर्णय चर्चेचा विषय बनला आहे.