
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने शेवटच्या स्थायी समितीमध्ये राखून ठरलेल्या १२३ प्रस्तावांपैकी २५ प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर पालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आणखी ४० प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.
दरम्यान भाजपने काही दिवसांपूर्वी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान यामध्ये कोरोनावर केलेल्या खर्चांचे तसेच डी-विभागातील घास गल्लीतील यानगृहाच्या इमारतीची दुरुस्ती, पुढील दोन वर्षांमध्ये सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी बसविण्यात येणारे पंप, शहरातील विद्यमान पुलांची रंगरंगोटी अशी ४० कामांचे प्रस्ताव आहेत. यांना बुधवारी मंजूर देण्यात आली आहे. तसेच नायर दंत रुग्णालयाकरिता इलेक्ट्रिकली ऑपरेटेड डेंटल चेअर्स आणि युनिट यंत्राचा पुरवठा, बोमनजी पेटीट रस्त्यापासून उमर पार्कमधील आरसीसी पाइपची पर्जन्य जलवाहिनी टाकणे, पूर्वमुक्त मार्गावर बोगद्यापासून भक्ती पार्कदरम्यान खडबडीत काँक्रीट पॅचेस पुनर्वसन, पवई तलावातील कारंजांची देखभाल अशा महत्त्वाच्या ४० प्रस्तावांचा समावेश आहे, तर उर्वरीत प्रस्तावांपैकी आणखी ४० प्रस्तावही सोमवारी प्रशासकांच्या मंजुरीसाठी सादर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे सोमवारी या ४० प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर केवळ २० ते २३ प्रस्ताव शिल्लक राहणार आहेत. मात्र, यामुळे स्थायी समितीने राखून ठेवलेले सर्वच्या सर्व प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता आहे.