नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईच्या शेजारी असणाऱ्या बृहन्मुंबई पालिकेत १ मे, महाराष्ट्र दिनापासून नळजोडणी दिली जाईल, असे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. त्यावर नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त करत नवी मुंबईत नळजोडणी कधी असा सवाल व्यक्त केला आहे.
पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतानाही कायद्याची अडचण दाखवत नवी मुंबई शहरातील लाखो घरांना नळजोडणी दिली गेली नाही. यामुळे मनपा प्रशासनाला दररोज लाखो रुपयांच्या महासुलावर पाणी फेरावे लागत आहे.
नवी मुंबई शहारत अवैध बांधकामे वाढू नयेत म्हणून नळजोडणीस प्रतिबंध आणले गेले. तसेच जी घरे १९९५ पूर्वीची आहेत. त्यांचे पुरावे पाहून पालिका पाणीपुरवठा विभागाकडून अशा ग्राहकांना नळजोडणी दिली जात आहे; परंतु पुरावे सगळ्यांकडे नसल्याने काही नागरिक नळजोडणीसाठी पात्र असतानादेखील त्यांना नळजोडणी दिली गेली नाही. त्यामुळे आजच्या घडीला लाखो घरे नळजोडणीपासून वंचित आहेत.
फेब्रुवारीमध्ये २०२२/२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करताना नळजोडणीविषयी देखील आयुक्तांनी सूतोवाच केले होते. तसेच काही कागदपत्र जमा करत देयके किती आकारावीत, याविषयीसुद्धा प्रशासनाला मार्गदर्शन केले गेले होते.
यामुळे मनपाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची वाढ, तर होणारच आहे. पण त्याचबरोबर आपल्याला अधिकृतपणे नळजोडणी मिळाली आहे. याचा नागरिकांना आनंद देखील झाला असता; परंतु आयुक्तांनी मार्गदर्शन करून दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी नळजोडणी संबंधी कार्यवाही होत नाही. पण बृहन्मुंबई पालिकेत १ मेपासून नळजोडणीची कार्यवाही होणार असल्याने आपसूकच नवी मुंबईत कार्यवाही कधी? या प्रकारचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही चालू आहे. लवकरच नळजोडणीची कार्यवाही समोर येईल.
– संजय देसाई, शहर अभियंता, पालिका