मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी सत्तेत असणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारला ३ मे म्हणजेच ईदपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. मात्र या भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी भोंग्यांवरुन महागाईबद्दल बोला, असा शाब्दिक चिमटा मनसेला गुरुवारी काढला. आदित्य ठाकरेंच्या या टीकेवरुन मनसे आणि शिवसेना आता आमने-सामने आली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेवरुन संताप व्यक्त केला. “महागाईबद्दल, पेट्रोल दरवाढीबद्दल आम्हीच बोलायचं… कोरोना काळात हे घरात लपून बसले होते आणि कोमट पाणी पिण्याचे सल्ले देत होते. तेव्हा लोकांच्या समस्या कृष्णकुंजवर येत होत्या त्या सोडवण्याचं कामही आम्हीच करायचं. लोकांच्या नोकऱ्या गेल्या, त्याचंही आम्ही पहायचं. मग यांनी काय फक्त संपत्ती गोळा करायची आणि पालिकेतल्या टेंडरमधील कमिशन खायचं, एवढंच काम आहे का? तेवढ्यासाठीच निवडून दिलंय का? सगळं आम्हीच करायचं तर मग तुम्ही काय झक मारायला सरकारमध्ये बसला आहात,” अशी विचारणा संदीप देशपांडे यांनी केली.
“तुमचे १८ खासदार संसदेत आहेत ते काय करतात. यांच्या खासदाराने आवाज उठवल्याची बातमी कधी येते का? संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेतात पण मग संसदेत का तोंड बंद असतं यांचं? सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या आणि तुम्ही काय फक्त पैसे खायला बसला आहात का?,” असा संताप संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला.
दुसऱ्यांना सल्ला देण्याआधी आपण काय करतो हे पाहणं गरजेचं आहे असंही ते आदित्य ठाकरेंवर टीका करताना म्हणाले. दारुच्या किंमती कमी केल्या. पण इंधनाचे दर कमी करत नाहीत, अशी टीका यावेळी त्यांनी केली.