ठाणे (प्रतिनिधी) : घरोघरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या जल जीवन मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेद्वारे देशातील ९ कोटी ४० लाख घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती भाजपचे आमदार व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पत्रकान्वये दिली. भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने नरेंद्र मोदी सरकारने विविध कल्याणकारी कामे केली आहेत. त्यानुसार जल जीवन मिशनसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ६० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार डावखरे यांनी दिली.
नरेंद्र मोदी सरकारने ग्रामीण भागातील प्रत्येक घरात २०२४ पर्यंत नळाने पाणीपुरवण्याचा संकल्प केला आहे. ग्रामीण भागातील जनतेला विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपिटीतून मुक्त करणे, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली. ९ एप्रिल २२ पर्यंत ९ कोटी ४० लाख घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवले जात आहे. १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत नळाद्वारे पाणी पुरविल्या जाणाऱ्या घरांची संख्या ३ कोटी २३ लाख इतकी होती.
तीन वर्षांत आणखी ६ कोटी १५ लाख घरांना नळाद्वारे पाणी पुरविण्यात आले. देशातील १०६ जिल्हे व १ लाख ४५ हजार गावांमध्ये प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याच्या योजनेची वेगाने अंमलबजावणी होत आहे. देशातील दीड लाख गावांतील घरांमध्ये जल जीवन अभियानाची १०० टक्के अंमलबजावणी झाली आहे, असे आमदार डावखरे यांनी सांगितले आहे. नरेंद्र मोदी सरकारने आता शहरी भागातही ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत १७ लाख ३९ हजार शाळा आणि अंगणवाड्यांमध्येही नळाद्वारे पाणी पुरविले जात आहे.
या अभियानासाठी ५ वर्षांत ३ लाख ६० हजार कोटी एवढी तरतूद करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला. ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी मैलो न मेल पायपीट करावी लागते. दुर्गम आणि पहाडी भागातील जनतेलाही पाण्यासाठी वणवण करावी लागते. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे महिलांचे पाणी आणण्यासाठीच कष्ट वाचले आहेत. ग्रामीण भागात एकूण घरांची संख्या १९ कोटी ३१ लाख एवढी आहे. घरोघरी नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट लवकरच साध्य होईल, असेही आमदार डावखरे यांनी नमूद केले.